पान:पायवाट (Payvat).pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा प्रश्नच आहे.
 या अलौकिकतेच्या शेजारी मानवी मनातील अक्षर भावभावनांचा आणि कलाकृतीच्या अनन्यसाधारणत्वाचा असे दोन मुद्दे अधूनमधून येऊन उभे राहताना दिसतात. अक्षर भावभावनांचा मुद्दा कोणे एके वेळी प्राध्यापक फड़के यांनी विस्ताराने मांडलेला होता. अक्षर वाङ्मयाला देश व समाजपरत्वे बदलणाऱ्या आणि कालपरत्वे बदलणाऱ्या सामाजिक प्रश्नांचा आधार नसतो. अक्षर वाङ्मयाला न बदलणाऱ्या अक्षर भावभावनांचा आधार असतो असा तो मुद्दा आहे. मानवी मनातील भावभावना अक्षर म्हणजे न बदलणाऱ्या आणि स्थिर आहेत की काय ?-हा मुद्दा विवाद्य असला तरी आपण बाजूला ठेवू. कारण सामाजिक परिस्थितीइतक्या वेगाने भावना बदलत नहीत, हे खरेच आहे. या मुद्दयाची खरी अडचण असेल तर ती ही आहे की, चांगल्या, मध्यम आणि वाईट वाङ्मयाला- सर्वानाच अक्षर भावभावनांचा आधार असतो. जे वाङ्मय समकालीनांतच कुणी वाचत नाही, ज्याला वाचगारे चांगले म्हणत नाहीत, लेखकाच्या हयातीतच ते विसरले जाते, किंवा त्याहीपेक्षा अधिक सरळ सांगायचे तर कधीच कुणी लक्षात घेतलेले नसते, त्यालाही अक्षर भावभावनांचाच आधार असतो. अशा जन्मतःच मेलेल्या किंवा जन्मापूर्वी मेलेल्या कथा-कादंबऱ्यांमधूनसुद्धा सुखदुःख, प्रेम, राग-लोभ यांचेच चित्रण असते. सफल अगर विफल कलाकृतींना त्याच भावभावनांचा आधार असतो. मग प्रश्न फक्त प्रत्ययाच्या उत्कटतेचा उरतो. अक्षर भावभावनांचा मुद्दा सांगूनसुद्धा चांगले वाङ्मय उत्कट भावगर्भ प्रत्यय वाचकांना देते इतकाच मुद्दा सांगितला जात असतो. तो कलावादाचा मुद्दा नसून सर्वांनाच मान्य असणारा समान मुद्दा आहे.
 हेच अनन्यसाधारणत्वाविषयी म्हटले पाहिजे. अनन्यसाधारणत्व हे जणू काही साधारणत्वाच्या विरोधी आहे अशीच या मंडळींची समजूत झालेली दिसते. हरि नारायण आपटे आणि केशवसुत या दोघांचीही वाङ्मयमहत्ता वादातीत आहे. आपापल्या क्षेत्रात दोघेही युगप्रवर्तकच मानले जातात. तरीही दोघांना मराठी भाषा ही साधारणच आहे.अनन्यसाधारणत्व साधारणाच्या विरोधी नसते. कलाकृतींमध्येसुद्धा साधारणत्व असतेच. ते घटनांचे, प्रसंगांचे, विषयांचे साधारणत्व असते. पण याखेरीज एक निराळेपणा असतो. साधारणत्वाखेरीज असणारा, साधारणत्व असून त्याला अधिक असणारा अनन्यसाधारणत्वाचा मुद्दा असतो. हे अनन्यसाधारणत्व फक्त कलाकृतींच्या ठिकाणी नसून लौकिक जगातल्या सगळ्याच जिवंत वस्तूंच्या ठिकाणी आवश्यकपणे आणि निर्जीवांच्या ठिकाणी कधीकधी दिसते. माणसासारखा माणूस नसतो. बोटांच्या ठश्यासारखे ठसे नसतात. बैलासारखा बैल नसतो. या प्रत्येक जिवंत वस्तूच्या ठिकाणी असणारे व्यक्तिवैशिष्टय मान्य केले व व्यक्तिवैशिष्टय प्रत्येक कलाकृतीच्या ठिकाणी असते असेही मान्य केले, तरी व्यक्तिवैशिष्टय हा कलात्मकतेचा पुरावा नसतो तर जिवंत मने कलाकृतींचे सृजन करतात, इतक्याचाच पुरावा असतो.

 कधीकधी असेही म्हटले जाते की, कविता ही प्रतिमांची संघटना असते. कविते-

१८६ पायवाट