पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तो अचानक सुटला तो तहसीलदार शिंदे यांच्या भेटीमुळे. दुस-या दिवशी सकाळी तालुक्याहून थेट ते माझ्या घरी आले. पण त्यांचा उतरलेला चेहरा पाहाताच मी ताडलं की, काहीतरी गंभीर समस्या आहे.

 थेट तहसीलदार म्हणून सेवेत रुजू झालेले शिंदे माझे आवडते तहसीलदार होते. कारण त्यांच्यात मी दहा वर्षांपूर्वीच्या ‘मला' पाहात होतो. माझ्यासारखाच त्यांचा संवेदनाक्षम स्वभाव, भ्रष्टाचाराचा तिटकारा व सामाजिक बांधिलकीचं असलेलं भान... माझंच ते प्रतीरूप होतं व ते जपणं मी माझं कर्तव्य समजत होतो.

 काही वेळ मी त्यांना विसावू दिलं. चहा झाला. मग मी हलकेच विचारल, ‘शिंदे, एनी प्रॉब्लेम ? बी फ्रेंक...'

 ‘सर, माझ्या तालुक्यात एक भूकबळी झालाय...' कसेबसे ते म्हणाले आणि मी हादरलो. एका क्षणात त्यांच्या त्या वाक्यामागे केवढं महाभारत दडलंय त्याची मुळासकट मला जाणीव झाली आणि मीही गंभीर झालो.

 शिंद्यानी जे सांगितलं ते ऐकताना जाणवत होतं की, जिल्ह्यात खरच रोजगाराची दुष्काळामुळे किती गंभीर समस्या बनली होती!

 'सर, काळगाव दिघीची ठकुबाई आहे. तिथं पाझर तलावाचं काम शेतक-यांनी अडविल्यामुळे बंद पडलं होतं, या बाईनं व तिच्या भावानं रीतसर अर्ज दिल्यामुळे त्यांनी जवळच्या पॉकेटमधील रांजणीच्या काऊडेपच्या कामावर जावं असा मी लेखी हुकूम दिला. तिथं ते पोचले, पण तिथल्या शेतक-याला आपल्या शेतात उन्हाळी भुईमूग घ्यायच्या असल्यामुळे त्यानं अडथळा केला व ते काम बंद पडलं. ठकुबाई व तिचा भाऊ परत गावी येताना वाटेतच ठकुबाई उपासमारीनं मेली असा रिपोर्ट आला आहे....'

 ‘पण आधी कुठेतरी हे बहीण-भाऊ कामावर असतील ना? तिथ धान्याची कुपनं मिळाली असतीलच की ते धान्य किती होतं किती दिवस पुरलं असतं ही माहिती काढली का?

 'हो, मी ती चौकशी केली आहे. मागील रस्त्याच्या कामापोटी त्यांना धान्य कुपनं बरीच मिळाली होती, पण त्या गावचं धान्य दुकान मी मागेच तक्रारीवरून सस्पेंड करून काळगावला जोडलं होतं. यात आणखी एक बाब अशी की, तालुक्यातला शेतमजूर पंचायतीचा अध्यक्ष विसपुतेनं ठकुबाईच्या भावाकडून कुपनं विकत घेतली व त्याच्या हातावर फक्त पन्नास रुपये टिकवले. आता रेशन दुकानात विसपुते व

पाणी! पाणी!! / ९२