पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'तर मर तू. तुला सांगून काई उपेग नाही हे म्या वळखायला हवं होतं आदीच!' किसन म्हणाला, 'तू आणि तुंज काम. मला काई सुदिक सांगू नगंस...!'

 त्यानं बाटली तोंडाला लावली आणि खाटेवर आडवा झाला. त्याच्या घोरण्याकडे कितीतरी वेळ ती पाहातच राहिली - सुन्नपणे काय करावं हे न सुचल्यामुळे हतबुद्ध होऊन!

 थोड्या वेळानं तिच्या घरी मुकादम आला. तो म्हणाला, 'पाटलीणबाई, मी शिर्केसाहेबांची समजूत घातली. ते कबूल झालेत. तुम्ही उद्यापासून कामावर या. फक्त आज दुपारचा खाडा पडेल एवढंच.'

 'तू माजा धरमाचा भाऊ बनून आलास बाबा. बस, च्या टाकते, पिऊन जा. सारजेच्या मनावरचा मोठा भार उतरला होता. तिचा रोजगार बुडणार नव्हता. तिला नाइलाजानं नवऱ्याच्या विष वाटणा-या पैशावर पोटाची खळगी भरायची पाळी येणार नव्हती.

 दुस-या दिवशी ती कामावर, वेळेवर पोचली, सपाटून काम केलं आणि भाकरतुकडा खायला दुपारच्या सुट्टीत बसल्यावर अमिनाला म्हणाली.

 'अमिना काल ती सायबीण आली व्हती. तिनं इचारलं व्हतं - रोजगार हमी कामामुळे बायामाणसावर काय परिणाम जाला. तवा म्या मनलं व्हतं, पुरुष मानस आळशी बनलेत नि दारू ढोसायला लागलेत... आमा बायावरचं कामाचं वझं त्येच्यामुळे लई वाढलंय... ते तर खरं हायच, पण आजून एक मह्या लक्षात आलंय - ही रोजगार हमी नाय हाय. आम्हा बायास्नी - गरिबास्नी सायेबलोग कवाबी कामावरून काढू शकतात. इथं कामाची हमी नाय हाय... त्येच्या दयेवरच काम मिळणार, त्येंची मर्जी असंल तोवरच काम मिळणार. ही... ही रोजगार हमी नाय अमिना रोजगार हमी नाय... म्हणून जगण्याची, पोटापाण्याची पण हमी नाय हाय!'


☐☐☐

जगण्याची हमी / १९७