" तुम्ही पाटलीण असून काम करता?'
त्या प्रश्नानं सारजा अवाक् झाली. क्षणभर काय उत्तर द्यावं हेच तिला सुचेना. मग ती हलकेच म्हणाली,
‘बाईजी, काम तर आम्ही लगीन जाल्यापासून करतो - पोटासाठी. पन धनी पाटील जाले आन् काम करायची त्येंना सरम वाटू लागली. आता म्या एकटीच राबते...'
ती बंगलोरहून या जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी आलेली आय. ए. एस. अधिकारी तरुणी अचंब्यात पडली होती.
कामावर नव्वद टक्के स्त्रिया होत्या. त्याबद्दल तिनं विचारलं, तशी पुन्हा सारजा म्हणाली, 'बाईजी, तुमी कुटंबी जा, हेच दिसंल रोजगार हमीच्या कामावर बायाच जास्त असतात.'
‘पण का? पुरुषांना बाहेर काम मिळतं का?' ।
‘याची लई कारणं हायती...' जरा विचार करीत सारजा म्हणाली, 'तुमी म्हंता तसंबी हाय. तालुका जवळ हाय, तिथं गड्यास्नी जादा पैशावर कामं मिळतात. बरेच जण सालगडी म्हनूनशानी असतात... पन आणखी एक कारण हाय - ते आमा बायांसाठी भयंकर हाय बगा.'
'ते कोणतं बाई?'
‘या रोजगार हमीमुळे गावातच काम मिळतं बायांना; मन् पुरुषाइतकी मजुरी पडते. कामबी हलकं असतं. नऊ ते पाच असं ठरलेलं असतं. म्हनूनशानी इथं बाया जास्ती येतात. त्यामुळे बगा, पुरुष गडी काम करीनात. आन् काम नसलं की दारू आली. गड्यांनी घरी बसून दारू प्यायची, बायकांना मारायचं आणि परपंचासाठी - लकीपोरांसाठी आमी बायांनी घरचं करून हे कामबी करायचं. परतेक मोट्या गांवामंदी दारूचे दुकान - हरेक वस्तीवर हातभट्टी लावलेली. म्या तर म्हंते बाईजी, दहामधले सात - आठ गडी दारू पितात आणि आमास्नी भाजतात बगा.'
ती अधिकारी स्त्री अवाक् होऊन ऐकत होती. तिच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत तिला काही ‘असाइनमेंटस' करायच्या होत्या. तिच्या मनाचा निश्चय झाला होता. 'रोजगार हमी कामाचा स्त्रीजीवनावरील परिणाम' हा एक विषय निश्चित झाला होता. त्यासाठी सारजा ही ‘टिपिकल केस स्टडी' होती!
'बाईजी, म्या आंगठेबहाद्दर....' सारजा पुढे सांगत होती, ‘मह्यास्नी नीट बयजेपार सांगता येनार नाय, पन म्या इचार करते, लई इचार करते... हे असं का?