पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सारजाला दारू व मांस -मच्छीचा तिटकारा होता. कारण तिचं माहेर गेल्या कित्येक पिढ्या गळ्यात वारकऱ्याची माळ घालणारं व सचोटीनं जगणारं. तिच्यावर ती निरक्षर असली तरी हेच संस्कार झालेले.

 एकदा किसननं आलेल्या साहेबाच्या बंदोबस्तासाठी बकरे कापलं होतं. त्यातलं उरलेलं घरी आणलं अन् तो म्हणाला, “पोरास्नी दे, तेवढंच वशट खातील.'

 'हे इख हाय, इख ! मह्या घरात ते नगो...' तिनं स्पष्टपणे नकार देत ते टोपलं सरळ फेकून दिलं होतं.

 तेव्हाच आयुष्यात लग्नानंतर प्रथमच ते जिवाला जीव देऊन सुखानं जगणारं जोडपं कडकडून भांडलं होतं.

 गावात कामासाठी - मुक्कामासाठी पोलिस खात्याची वा महसूल खात्याची माणसं येणं म्हणजे किसनसाठी पर्वणी असायची. मस्तपैकी झणझणीत खाणं व भरपूर पिणं बाहेरच्या बाहेर व्हायचं. पण रोज कोण येणार? पुन्हा तालुका मोठा होता. इतर वेळी त्याला नशा अस्वस्थ - बेचैन करायची. जीभ वशट - झणझणीत कोंबडी - बिर्याणीला लसलसायची. त्याला मिळणारं मानधन मग वरच्या वर उडून जायचं.

 गावकऱ्यांच्या मनात असो वा नसो, त्यांचं पोलिस पाटलाशी काम पडतंच. हळूहळू किसननं आपला जम बसवला होता.

 पण त्याच्या पाटीलकीचे चटके सारजेला बसू लागले होते. एकेकाळी तिला पाटलीण हे सुखविणारं संबोधन आता नकोसं वाटू लागलं होतं.

 त्याचा घरात पाय ठरत नव्हता व तिला कामातून घराकडे पाहायला फुर्सद नव्हती. आई-बाप असूनही तिची पोरं उघडी पडली होती; पण केवळ हळहळ करण्यापलीकडे तिला काही करता येत नव्हतं. परिस्थितीचा रेटा तिला मन कठोर करायला शिकवत होतं.

 तिनं लगबगीनं सारं आवरतं घेत आणलं होतं, तेव्हा किसन जागा झाला होता त्यानं बाजेवरूनच ऑर्डर सोडली ‘च्या...!'

 ‘आदी तोंड तरी खंगाळून या धनी !'

 ‘नाय, म्या असाच च्या पिणार हाय...,' तो म्हणाला, “ही बड्या सायेब लोकांची पद्धत हाय म्हनलं...'

पाणी! पाणी!! / १८८