पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्हायची, पण आता तिच्या एकटीच्या कमाईत कच्याबच्यांची पोटं भरता भरता जड जाऊ लागलं.

 किसनला मात्र पाटीलकीची मिजास चढली होती. आधीच्या पोलिस पाटलाचा दरारा व रुबाब तो पाहात होता. पण केवळ तो कैकाडी असल्यामुळे त्याला पोलिस पाटील करण्यात आलं होतं, हे गाव विसरायला तयार नव्हतं. परत आलेल्या पोलिस व महसूल खात्याच्या साहेबलोकांचा बंदोबस्त करणं त्याला पैशाअभावी जमत नसे. त्यामुळे गावचा तलाठी पण त्याला मान देत नसे.

 तरीही तो आपला नसलेला रुबाब सांभाळायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे त्याला आता पोटासाठी काम करणं कमीपणाचं वाटू लागलं होतं आणि त्या प्रमाणात सारजेवरचा प्रपंचाचा भार वाढत चालला होता.

 त्याला पोलिस पाटील म्हणून मानधन मिळायचं ते तुटपुंजे व तेही तीन महिन्यांतून एकदा. त्याच्यापेक्षा रोजगार हमी कामावरील सारजेची साप्ताहिक मजुरी जादा असायची.

 तरीही आपला नवरा पोलिस पाटील आहे, याचं तिलाही अप्रुप होतं. म्हणून तीही त्याचं काम न करणं सहन करायची.

 एकदा गावात चोरीची केस झाली होती. त्याच्या तपासाला फौजदार आले होते. त्यांना रात्री पहिल्या धारेची लागायची. तेव्हा त्यांनी किसनला बोलावून ती आणायचा हुकूम दिला. तो कचरला. खिशात तर दमडाही नव्हता. तेव्हा गावकोतवालानं त्याला बाजूला नेलं आणि सांगितलं,

 ‘आवं, असं वं कसं पाटील तुमी? जरा गस्त घालत जा. मंग कळेल गावात कोन कोन हातभट्टी लावीत असतो ते. चला माझ्यासंगट, म्या दावतो.'

 आणि कोतवालानं किसनला पोलिस पाटलाच्या परंपरागत अधिकाराची खऱ्या अर्थानं जाणीव करून दिली. त्या दिवशी फौजदार ढेर होऊन झोपल्यावर कोतवालाच्या हातानं त्यानंही पहिला प्याला घेतला.

 कोतवालाचा गुरुमंत्र किसनचं जगच पालटून टाकणारा ठरला. पाटीलकीच्या रुबाबावर त्याचं फुकट खाणं-पिणं निर्वेधरीत्या सुरू झालं.

जगण्याची हमी / १८७