Jump to content

पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ईटचं पूर्ण सव्वाशे मतदान त्यांच्या विरोधात पडलं होतं. यामुळे इराच्या वाडीवर व खासकरून पोलिस पाटलावर त्यांची खुन्नस होती.

 नळयोजनेच्या विहिरीचं पाणी कमी झालं. पाण्याच्या निमित्तानं केरगावच्या सरपंचाला आपला जुना हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली व ती त्यांनी पुरेपूर साधली.

 केरगावातही पाण्याची टंचाई जाणवत होतीच. गावकऱ्यांनी सरपंच या नात्यानं त्यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी संयुक्त नळयोजना हे कारण सांगून म्हटलं,

 ‘लोकहो, खरं तर या पाण्यावर आपल्याच गावचा हक्क असायला पाहिजे. कारण नळयोजनेची विहीर आपल्या शिवारात आहे. आपल्याला पाणी पुरत नसताना का म्हणून इराच्या वाडीला पाणी द्यायचं?'

 हा इशारा लोकांना पुरेसा होता. एक रात्री गावकऱ्यांनी विहीरीपासून इराच्या वाडीकडे जाणारी जाण्याची पाइपलाइन तोडून टाकली व सारेच्या सारे पाइप गायब केले.

 आणि पुन्हा इराच्या वाडीवर गावातल्या पडक्या विहिरीतलं नारूमिश्रित पाणी पिण्याची पाळी आली.

 हे वृत्त सजताच तहसीलदार जाधव घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी केली व यामागे सरपंच (केरगाव) आहेत हे समजताच सरळ सरपंचाविरुध्द पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पण आता सरपंच प्रबळ बनले होते. मधल्या काळात विधानसभेची निवडणूक झाली होती व निवडून आलेल्या आमदाराचं सरपंचाशी नातं होतं. या जोरावर तालुक्याच्या राजकारणात सरपंचाची ऊठ-बस आमदाराचे उजवे हात म्हणून होत होती.

 आमदारांनी हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला व वरपर्यंत जाऊन राजकीय दडपणानं हा न्यायप्रविष्ट खटला मागे घेण्याचे आदेश आणले व त्याप्रमाणे खटला मागे घेण्यात आला. पण तहसीलदार जाधवांची या प्रकरणी तडकाफडकी बदली झाली. आणि त्यानंतर या गावाकडे कुणी फिरकलंच नाही.

नारुवाडी / १३७