पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘पाटील, आता मी तुमचा भाग सोडत आहे. बदली झाली आहे. पण मला एक समाधान आहे, तुमच्या गावासाठी, इराच्या वाडीसाठी मी काहीतरी करू शकलो. आता मला व्हिजिट बुक द्या, आज पुन्हा मला अभिप्राय लिहायचा आहे.'

 पाटलानं व्हिजिट बुकाची जुनी चोपडी पुढे केली. त्यातील आपला प्रथम भेटीचा अभिप्राय जगदीशनं पुन्हा वाचला व काहीशा समाधानानं लिहिलं,

 ‘आपण नेहमी खेदानं आपल्या इराच्या वाडीला ‘नारूवाडी' म्हणता. दुर्दैवानं ते खरंही होतं. पण आज तुम्हाला शुध्द पाणी मिळत आहे व ईटच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर देशपांडे यांच्यामुळे उपचारही. तेव्हा आणखी वर्ष - सहा महिन्यात इथल्या नारूचं पूर्ण उच्चाटन होऊ शकेल, असा विश्वास वाटतो. पुन्हा म्हणून आपण कधी ‘नारूवाडी' म्हणू नका.... आता गावात पायाभूत सोयी होत आहेत व भविष्यात या गावाचा चांगल्या रीतीनं विकास होऊ शकेल. त्यासाठी माझ्या शुभेच्छा!

 जगदीशसमवेत, सेवेत प्रथमच या तालुक्यात रुजू झालेले तहसीलदार जाधव होते. त्यांना जगदीशनं या गावची सारी कहाणी येताना जीपमध्ये सांगितली होती. त्यांचा हात हाती घेऊन काहीसा भावनाविवश होत जगदीश म्हणाला,

 ‘जाधव, हे गाव, ही इराची वाडी माझ्यासाठी ‘स्पेशल' आहे. हे गाव मी आजपासून तुम्हाला दत्तक देत आहे. गावाकडे सतत लक्ष द्या.'

 तहसीलदार जाधवही संवेदनक्षम व कळकळीचे होते. त्यांनी ते वचन पाळल. किंबहुना त्यांची बदली या गावाच्या प्रेमापोटीच झाली काही महिन्यानंतर !

 जगदीश गेला आणि एप्रिल महिना उजाडला. यावर्षीपण गतवर्षीप्रमाणे पाऊस अल्प झाल्यामुळे नदी, नाले व विहिरी आटल्या. गावोगावी परत पाण्याची ओरड सुरू झाली.

 केरगावच्या पश्चिमेला दीड किलोमीटरवर संयुक्त नळयोजनेची बांधलेली विहीर होती. तिचं पाणी झपाट्यानं ओसरू लागलं. दोन्ही गावांना म्हणजे केरगाव व इराची वाडीला पाणी पुरेनासं झालं.

 केरगावचे सरपंच पहिल्यापासूनच या संयुक्त नळयोजनेवर नाराज होते कारण एक तर त्यांना बांधकामाचं टेंडर मिळालं नव्हतं. त्यामुळे सुटणारे पैसे बुडाले व दुसरं म्हणजे या गावानं त्यांना मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते सदस्य म्हणून ईटमधून उभे असताना साथ दिली नव्हती, ते चाळीस मतांनी पडले होते व

पाणी! पाणी!! / १३६