देखरेख करायचा. त्याचे सारे सहकारी त्याच्या या झपाटलेपणाची टिंगल करायचे, तेव्हा तो आवेशानं म्हणायचा,
'नाही दोस्त, ही बाब थट्टेवारी नेण्यासारखी नाही. विकास प्रशासनाची माझी जी कल्पना आहे, ती विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या दुर्दैवी गावात मी राबविण्याचा पयत्न करीत आहे. डिटॅच होऊन हे होणार नाही, म्हणून हा अट्टहास आहे. किमान प्रत्येक पोस्टिंगच्या ठिकाणी एका गावाचा तरी माझ्या हातून कायापालट व्हावा ही मनीषा आहे. याची सुरुवात मी इराच्या वाडीपासून करीत आहे.'
पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली व गावी शुध्द, स्वच्छ पाणी टाकीतून तोटीद्वारे आलं, तेव्हा सबंध इराची वाडी आनंदाने बेहोष होत थयथया नाचू लागली आणि उत्सफूर्तपणे त्यात जगदीशही सामील झाला.
काही क्षणांतच हा इतिहास जगदीशच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखा उलगडत गेला आणि मग भानावर येत त्यानं विचारलं,
‘पाटील, काय झालं मी गेल्यानंतर ?'
‘ती एक चित्तरकथाच हाय सायेब.... पाटील म्हणाले.
‘सांगा मला, पाटील, मी ऐकू इच्छितो.'
आणि पाटलानं पुन्हा बांध फुटल्यागत बोलायला सुरुवात केली.
तो डिसेंबरचा महिना होता, जेव्हा इराच्या वाडीमध्ये केरगाव - इराची वाडी संयुक्त नळ पाणीपुरवठा योजनेचं स्वच्छ व शुध्द पाणी नळावाटे आलं होतं. सारं गाव बेहोष होऊन नाचलं होतं. त्यात पाटलांचा हात धरून जगदीशही सामील झाला होता. आजही ती याद पाटलांच्या मनात ताजी, बकुळफुलासारखी सुगंधी आहे.
दोन महिने पाणीपुरवठा नियमित होत होता. केरगाव व इराची वाडी या दोन्ही गावांतली पाण्याची समस्या सुटली होती, स्त्रियांची पाण्यासाठीची वणवण थांबली होती. इराच्या वाडीतील लोकांच्या नारूच्या ठसठसत्या वेदना लिंपल्या जात होत्या..... प्रत्येक वेळी गावकरी जगदीशला पाणी पिताना दुवा द्यायचे!
आणि जगदीशची बदली झाली एप्रिल महिन्यात, तेव्हा चार्ज सोडण्यापूर्वी तो आवर्जून गावी गेला होता. तेव्हा त्यानं पाटलाला म्हटलं होतं,