पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जगदीशनं डॉक्टरांचा हात हाती घेऊन किंचित दाबला. काही न बोलता तो सोडला. पण त्या स्पर्शाद्वारे त्याला जे सांगायचं होतं, ते डॉक्टरांना खचितच समजलं होतं. जगदीशला एक समानधर्मी सापडला होता.

 ‘आता तुमचा अभिप्राय पायजे साहेब. पाटील म्हणाले, 'आनी लोकास्नी चार सबुद सांगावेत...'

 'ठीक आहे, कसलासा निश्चय करून जगदीश म्हणाला, “आधी मी बोलतो, मग अभिप्राय लिहितो.'

 समोरच्या लोकांसमोर जात तो बोलू लागला,

 'माझ्या बंधू-भगिनींनो... जुन्या काळी चाळीस वर्षांपूर्वी तेव्हाचे जहागिरदार या गावी आले होते. त्यानंतर मागच्या आठवड्यात डॉक्टर आले व आज मी येत आहे. म्हणजेच गेली चाळीस वर्ष हे गाव या जिल्ह्यात, या तालुक्यात असूनही नसल्यासारखंच होतं. एकही विकास योजना या गावापर्यंत पोचली नव्हती वा नाही... हे तुमचं दुर्दैव आहे व आमचा कमीपणा आहे. एक जबाबदार अधिकारी म्हणून मला याची शरम वाटते. आमच्या हाती एवढा अधिकार असूनही आजवर या गावाकडे कुणी अधिकारी, कुणी लोकप्रतिनिधी फिरकला नाही. मग विकास कसा येईल इकडे? मी तुमचा शतशः अपराधी आहे. पण एक सांगतो. आता मात्र मी माझ्या अधिकारांचा वापर करीन आणि तुमच्या गावाला रस्ता करून देईन आणि मुख्य म्हणजे नळयोजना देईन. एका वर्षात या गावातून नारूचे उच्चाटन झालं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीन. इथं वारंवार येईन हे जे बोलतोय, ते पोकळ आश्वासन समजू नका. मी ते कृतीमध्ये आणून दाखवीन...

 आणि जगदीशनं परतल्यापासून झपाटल्याप्रमाणे इराच्या वाडीसाठी योजना बनवल्या. रोजगार हमीमार्फत रस्त्याचे काम मंजूर करवून पंधरा दिवसात सुरू केलं, तसंच परिसर अभियांत्रिकी विभागाच्या उपअभियंत्यास घेऊन नळयोजनेसाठी स्थळपाहणी केली, पण गावात पाण्याचा स्त्रोत नव्हता. पलीकडच्या पठारावर ग्रामपंचायतीचं केरगाव होतं. त्याच्याअंतर्गत इराची वाडीला ग्रुप ग्रामपंचायत होती, तिथं पाण्याचा स्त्रोत भूजल सर्वेक्षण करण्यासाठी दिला. केरवाडीलाही पाण्याची टंचाई होती, म्हणून दोन गावासाठी संयुक्त पाणी योजना तयार करून तिचा सतत पाठपुरावा करून सहा महिन्यात मंजुरी आणली व कामाचा शुभारंभ केला. स्वतः वेळोवळी तो

पाणी! पाणी!! / १३४