पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'आज दहा जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस, शुक्रवार रोजी इराच्या वाडीला भेट दिली. आमच्या जहागिरीतलं हेच गावे आम्ही जातीनं आजवर पाहिलं नव्हतं. गाव तसं भलं व लोकही सुस्वभावी आहेत. शेती चांगली पिकते, तरीही मुळातच ती कमी आहे. त्यामुळे रयतेचं भागत नाही. म्हणून या वर्षापासून आम्ही एक आणा जमीन महसूल प्रतिएकरी कमी करत आहोत. तसेच यापुढे जेव्हा जेव्हा या गावची शेती पिकणार नाही, तेव्हा रयतेकडून महसूल घेतला जाणार नाही. आज आमच्या नजरेसमोर गावक-यांनी पाण्याची समस्या आणली. या गावासाठी आम्ही दोनशे रुपये मंजूर करीत आहोत. त्यातून विहीर बांधून घ्यावी. आम्ही उद्याच मुनीमजीला रकमेसह पाठवीत आहोत.'

 आणि जहागिरदारांची उर्दूमधून झोकदार सही होती.

 'अच्छा, म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीस साली विहीर झाली म्हणायची....' जगदीश म्हणाला, “पण काय हो पाटील, त्यावेळच्या मानानं दोनशे रुपयेपण खूप होते. एवढ्या पैशात सहजपणे पक्की विहीर नाही का बांधता आली असती?'

 "होय सायेब, पण जागिरदारसायेबांचा मुनीमजी निस्ता भाडखाऊ व्हता...त्यानं निम्म्यापेक्षा जास्ती पैसे हाडपले आन् ही अशी कच्ची हीर बांधली.'

 बाकी काही असो - नसो; पण भ्रष्टाचार हा तेव्हाचा जहागिरदारांच्या राजवटीचा व आपल्या स्वतंत्र भारतातील राजवटीचा समान धागा आहे म्हणायचा...' अशी एक प्रतिक्रिया जगदीशच्या मनात टिपली गेली.

 आणि त्याखाली मागच्या आठवड्यात भेट देणा-या डॉक्टर देशपांडेचा अभिप्राय होता,

 'मी गावातल्या प्रत्येक व्यक्तीला झालेला नारू पाहून अस्वस्थ झालो आहे. दूषित पाणी व असुरक्षित विहीर हे याचं मूळ कारण आहे, ते दूर करणं डॉक्टर म्हणून मला शक्य नाही; पण ही बाब मी प्रशासनाच्या नजरेस आणून देईन. माझं काम आहे रोगप्रतिबंध करणं व झालेल्या रोगाची इलाज करणं ईटला प्राथमिक आरोग्य केंद्रात या गावच्या प्रत्येक व्यक्तीचा मी मनापासून इलाज करीन व दर पंधरा दिवसाला मी स्वतः इथं येईन पण विहिरीवर कट्टा बांधावा व पायऱ्या बुजवाव्यात व रहाट बसवून पाणी घ्यावं.. आणि ते उकळून प्यावं. म्हणजे बऱ्याच अंशी रोगाला आळा बसू शकेल.'

नारूवाडी / १३३