पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जवळपास पाऊण तासाच्या चालण्यानंतर ते तिघे इराच्या वाडीला पोचले. या कालावधीत तो उजाड माळरानाचा परिसर पाहून जगदीशच्या मनातील ‘ग्रामीण विकास' संकल्पनेचा पार फज्जा उडाला होता.

 स्वातंत्र्यानंतर चाळीस वर्षांनंतरही इराच्या वाडीला पक्का रस्ता नव्हता, पिण्याचं शुध्द पाणी नव्हतं आणि हे केवढं विदारक होतं. हे बड्या शहरातील पंचतारांकित हॉटेलात ग्रामीण विकासावरील परिसंवादामध्ये शासनाच्या विविध विकास योजनामुळे ग्रामीण स्तर किती सुधारत आहे, याची चर्चा होत असताना एक दुर्दैवी गाव नारूमिश्रित पाणी पितं आणि उघड्या डोळ्यांनी तो भयंकर, किळसवाणा रोग ओढवून घेतं !

 'काय सांगू तुम्हाला देसाईसाहेब, हा पाटीलही अशातच नारूग्रस्त झाला आहे. तो पाणी गाळून उकळून प्यायचा तरीही त्याच्या उजव्या पायाला नारू झालाय. आज जखम चिघळलीय म्हणून उपचाराला आला होता.'

 ‘आसपास पंचक्रोशीत डॉक्टर नाही?'

 ‘गावात कोणी डॉक्टर नाही. या पोलिस पाटलाचा मुलगा डॉक्टर आहे. त्याला मोठ्या जिद्दीनं पाटलांनी औरंगाबादला मेडिकलला घातलं. माझा तो बॅचमेटच आहे. त्यांची इच्छा होती की, मुलानं डॉक्टर होऊन गावच्या पंचक्रोशीत किंवा ईटला दवाखाना थाटावा आणि गावक-यांना इलाज करावा... पण तो मेडिकलला जॉईन झाला, तसा गावी आलाच नाही. आज औरंगाबादला तो प्रेक्टिस करतोय. ही हेट इराची वाडी... कारण त्याला भीती व किळस वाटतेय नारूची...

 जगदीशच्या मेंदूची पेशीनपेशी हादरत होती. हे सारं त्यानं कधी ऐकलं नव्हतं, कल्पिलंही नव्हतं.

 गावाच्या प्रवेशालाच एक जुनीपुराणी, बरीच मोडकळीस आलेली कमान होती, त्याकडे बोट दाखवीत पाटील म्हणाले,

 ‘साहेब, हे आमचं परवेश दार. ही कमान जागिरदारानं बांधलेली बघा, आता त्योबी कोलापुरास्नी राहतो, मन तो जवा तरणाबांड जवान गडी व्हता, तवा त्यानंबी ठरवलं व्हतं. जागिरीची समदी गावं पाहायची. असंची वर्दी देऊन त्यो आमच्या इराच्या वाडीला आला. तवा गावानं त्याच्या सन्मानासाठी ही कमान तयार केली. तवा मी साळेत जात व्हतो. पन मला ते समदं ध्यानी हाय. म्याबी तवा काम केलं व्हतं...

पाणी! पाणी!! / १३०