पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विकून टाकली. काय करणार? वैरणंच झाली नाही. दोन राहिली ती बैलगाडीला हवी आणि शेतीला पण. त्यांना जगवलं पाहिजेच.'

 ‘कारखान्यात काम करताना एवढं बरं हाय-जनावरांना ऊस तोडल्यानंतरचा पाला घालता येतो.' रामजी अनुभवाचे बोल बोलला, 'मीही सर्व जनावरं घेऊन आलोय?'

 ‘दरवर्षीची ही पिरपिर. राम जाणे किती दिवस हे असंच चालायचं आपलं?' महादूच्या आवाजात विखार दाटून आला होता. तो रामजीला पण समजला. तो समंजसपणे म्हणाला,

 ‘भोग आहेत बाबा हे, कुणाला चुकलेत? आपल्या हाती काही नाही, तर मग उगीच कावून काय फायदा?'

 थोडं थांबून गंभीर होत रामजी पुढे म्हणाला,

 ‘एक अनुभवाचं सांगू? अरे दुःख आणि काळजी तरी किती करावयाची? आता कशातच काही वाटत नाही. आला दिवस तो आपला, गेला दिवस राम भला. येणा-या दिवसाची पर्वा कशाला?'

 रामजीचा तो स्थितिवादी समंजस शहाणपणा महादूला स्पर्शून गेला. त्याला वाटलं, आपणही असं बनावं म्हणजे खालीपिली त्रास नाही होणार. मन नाही कडवटणार आणि जीव नाही अस्वस्थ होणार.

 ट्रक वेगानं धावत होता. त्या वेगाची लय रामजीत भिनली होती. त्याला पेंग येत होती आणि संभाषणाला त्यामुळे खीळ बसली. महादूपण विचारात गुंगला.

 वसरणीला पोहोचल्यावर महादूचा विषाद चौधऱ्याची बहरलेली ऊस शेती पाहाताच पुन्हा जागृत झाला. त्याला वाटलं... ज्या असंख्य बड्या शेतक-यांनी दबाव आणून पाणी लाटलं, त्यात चौधरीपण असतील. या तालुक्यात निरेचं पाणी कालव्यान मिळतं. यंदा कधी नव्हे ते पाणी कमी पडलं. आणि आपल्या मालाला मिळणारं पाणी इथंच अडलं गेलं आणि गेलं पाव शतक त्यांनी उसातून सोन्याचा धूर काढला. त्यांच्या जळणा-या उसाला पाणी प्राधान्यानं दिलं गेलं आणि ज्या तृषार्त तालुक्यास कालव्याचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रथमच पाणी मिळत होतं आणि त्या पाण्यावर अनेकांनी प्रथमच

पाणी - चोर / ११