पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यानंतर दोन वर्षे पाणीटंचाई या विहिरीचे पाणी दलपतनं गावाला दिलं होतं. पण यंदा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शासनाने गतवर्षी विहीर टंचाईखाली अधिग्रहीत करूनही त्याचे पैसे न दिल्यामुळे व यंदा शेतीमध्ये उस व गहू पेरल्यामुळे त्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे व विहीर अधिग्रहित केली तर त्याचं फार मोठे नुकसान होईल, असा युक्तिवाद करून दलपतच्या वकिलानं कायमचा मनाई हुकूम घेतला होता.

 त्यामुळेच गावक-यांना यंदा भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत होतं. गावच्या जुन्या माली पाटलानं आपल्या शेवटच्या मुलीचं लग्न गावात न करता मुलाच्या गावी - शहरात मंगल कार्यालयात केलं होतं. गावजेवणाचा विषय निघाला, तेव्हा त्यांनी सरळ ती मागणी धुडकावीत म्हटलं होतं, 'गावजेवण नाही. बायांनों प्यायला पाणी कुठंय ?'

 हा टोला भय्याच्या वडिलांना होता. या दोन घराण्यांची परंपरागत दुष्मनी होती. व नळयोजनेच्या कामात भय्याच्या वडिलांनी पैसे खाऊन निष्कृष्ट काम केले, म्हणून आज पाईपलाईन फुटली व पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली त्यांचा वारस भय्या आता तेच करीत आहे, अशी माहितीही त्यांनीच पेरली असावी, असा भय्याचा कयास होता. यात सत्त्यांश जरी असला तरी राजकारणात तो अद्याप पूर्णपणे मुरलेला नव्हता व त्याची कातडी अजूनही संवेदनशील होती, म्हणून याचा त्याला थोडाबहुत मनस्तापही होत होता.

 म्हणूनच जेव्हा म्हाता-या चंपकशेठचा निरोप घेऊन भय्या बाहेर पडला आणि आपल्या बुलेटला किक मारीत धुराळा उडवीत वेगानं जाऊ लागला, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार घोळत होता... दलपतला सरळ केलं पाहिजे. आता त्याची साथ राजकारणासाठी फायदेशीर उरलेली नाही.

 पण दलपतही वस्ताद निघाला. भय्यानं 'विहीर खुली करून दे' असं दोस्तान्यात विनवूनही त्यानं दाद दिली नाही. उलट चक्क नकार दिला. वर साळसूद उपदेशही केला,

 'भय्या, डोंट वरी, अजून एक टँकर मंजूर करून घे. पुढल्या महिन्यात उपसभापतीची निवडणूक आहे. तेव्हा मी आहे तुझ्या पाठीशी. पैशाची चिंता नको.'

 पण या क्षणी भय्याला उपसभापतीपद दिल्लीएवढं दूर वाटत होतं. आणि गावकरी चिडले होते व त्यांचा रोष भय्याला परवडणारा नव्हता. प्रथम आपलं गाव व मग मतदारसंघ सांभाळला पाहिजे. बाकी गोष्टीसाठी वेळ आहे...

मृगजळ / १२१