काल ज्या गावकऱ्यांनी मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जवळपास शंभर टक्के मतदान भय्याच्या बाजूने करून त्याला निवडून दिलं होतं, ते गावकरी व खासकरून तरुण मंडळी त्याच्यावर कमालीची रुष्ट होती. कारण होतं पाणीटंचाई, भय्यानं तातडी करून टँकर मंजूर करून घेतला होता; पण विहिरीतून पाणी शेंदायची सवय गेल्या चार-पाच वर्षापासून मोडली होती. कारण गावात भय्याच्या वडिलांनी सभापती असताना नळयोजना कार्यान्वित केली होती. गुत्तेदार त्यांचा मेहुणा व भय्याचा मामा होता. त्याने निकृष्ट पाईप खरेदी करून मोठा डत्ला मारला होता व ती पाईपलाईन आता फुटली होती आणि नळयोजणेची विहीर गाळाने भरुन गेली होती. गावात अनेकांना हे माहीत होतं, तेच काल रात्री प्रक्षुब्ध अवस्थेत बाहेर आलं होतं.
'भय्या या पंचक्रोशीत राजकारणात तुमची घराणेशाही आम्ही विनातक्रार मान्य केली ती जनतेची कामे व्हावीत म्हणून; पण तुम्ही पहिल्याच वर्षी पाण्यासाठी तरसावत आहात.'
‘पण पाटील, मी नळयोजनेच्या दुरुस्तीची योजना मंजूर करून घेतली आहे. टेंडर फायनल झाले की काम सुरू होणार.'
‘पण तोवर जून येईल, पाऊस पडेल. त्याचा काय उपयोग? आणि तोवर पाण्याचं काय?"
‘त्यासाठी यंदाही चंपकशेठची विहीर ताब्यात घ्यायला हवी'
‘पण त्यानं कोर्टातून स्टे आणला आहे. मी काय करू?'
'ते आज झालं हो; पण जेव्हा दलपतनं चक्क ओढ्यामध्ये विहीर बांधली व तेवढा भाग आपल्या शेतात वायर फेन्सिंग करून घेतला, तेव्हा प्रांतसाहेबाकडे पैरवी तुम्हीच केली ना दलपतची !'
भय्याची अवस्था मोठी अवघडल्यासारखी झाली होती. राजकारणात कसल्या कसल्या तडजोडी कराव्या लागतात. त्यावेळी परिणामाची कल्पना येत नाही. कालांतराने मात्र ते जेव्हा प्रत्ययास येतं, त्याची भीषणता जाणवते.
भय्यानं दलपतला साथ दिली होती विहिरीच्या प्रकरणात, दलपतनं सरकारी ओढ्यामध्ये चक्क विनापरवाना विहीर खोदली होती व गिरदावरला पैसे चारून फेरफार मंजूर करून घेतला होता. म्हणजे कागदोपत्री तेवढी जमीन व विहीर ही दलपतच्या मालकीची होती. त्यावर गावातला पहिला दलित वकील भीमराव सपकाळनं प्रांतसाहेबांकडे अपील केलं होतं. पण त्यांनीही भय्या - दलपतच्या प्रभावाला पडून ते फेटाळलं आणि दलपतचं अतिक्रमण छानपैकी पचलं गेलं होतं.