पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘देवाघरचा न्याय इपरीत म्हानावा की काय.... परशूच्या मनाला पडलेलं कोडं सुटत नव्हतं. पण दाडून आलेला क्षोभ व एक प्रकारची सुन्न बधिरता मात्र जात नव्हती. ते हिरवं रान व बहरलेला मळा जीवाला त्रास देत होता, दंश करीत होता...

 अचानक काहीतरी सळसळत निघून गेल्याचा आवाज झाला, तेव्हा परशूनं दचकून पाहिलं आपलं गर्द हिरवं अंग दिमाखानं सळसळ करीत एक जातिवंत साप संथपणे येत होता !

 परशू त्याच्याकडे नजर बांधल्यासारखा पाहात राहिला.

 मानवी चाहूल लागल्यामुळेच की काय, त्या सापाने फणा काढला? व ‘हिस्स्...' असा फुत्कार टाकला...

 आपले मांजरासारखे असलेले व किंचित हिरवी झांक मारणारे घारे डोळे रोखून परशू त्या फणा काढलेल्या हिरव्यागर्द सापाकडे एकटक पाहात होता.

 ...आणि पाहाता पाहाता त्या दोन मानवी डोळ्यात सर्प उतरला...!


 समोरचं तारेचे काटेरी कुंपण पाहाताच आपल्याच नादात उघड्या पायांनी तापलेल्या जमिनीचे चटके सोसत चटाचटा चालणा-या भीमी व रखमा थबकल्या. आणि त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

 पूर्वेकडून वाहात येणा-या ओढ्याच्या दक्षिणेकडे गाव पसरलेला, तर उत्तरेकडे बौद्धवाडा व मातंग समाजाची वस्ती. त्याच्या टोकाशी भिडलेला व सुळक्यासारखा पात्रात शिरलेला चंपकशेठचा मळा. त्यातून गावामध्ये जायची पायवाट पूर्वापार होती. पण आवंदाच शेठनं तारेचे कुंपण घालून तो रस्ता बंद केला. त्यामुळे गावात जाण्यासाठी वाट वाकडी करून दोन फर्लागाचा फेरा घालून जावं लागायचं....

 बौद्धवाड्यातला प्रत्येक माणूस गावात जाताना शेठनं मळ्याला घातलेलं. तारेचं भरभक्कम कुंपण पाहून थबकायचा. मनोमन किंवा उघडपणे शेठच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करणारी शिव्यांची लाखोली वाहायचा व दूरची वाट पकडायचा.

 आताही माहेरपणाला आलेली भीमी म्हणालीच, ‘रखमे, आक्रीतच की गं हे. बापूस म्हणालला, आता नदरेनं बघितलं. साऱ्या बुद्धवाड्याला तरासच की हा....'

 ‘हां भीमे-' रखमा म्हणाली,' आपल्या समाजाची वाट शेठनं रोखली. दाद ना फिर्याद... तलाठ्याला दादांनी तक्रार लिहून दिली, पण कोण खबर घेतो? - आपण आधीच गावकुसाबाहेरचे. साऱ्यांनी झिडकारलेले. ही पायवाट तरी आपली का म्हणून राहील?'

मृगजळ /११५