पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संरपंचाना सांगूनही ठेवलं होतं. झालंच तर मघाशी भुजबळअण्णांचीही परवानगी घेतली होती.

 हा टँकर ज्या ट्रकवर माऊंट केला होता, तो जुना असल्यामुळे व त्याचा सायलेन्सर काम देत नसल्यामुळे चालू स्थितीत प्रचंड आवाज करायचा.

 आज त्या ट्रकनं मोजून चार खेपा केल्या होत्या. प्रत्येक खेपेला गावाला प्रचंड आवाज करीत वळसा घालताना साऱ्या गावाला आपोआप कळून चुकायचं, की पाणी आलं आहे.

 उद्या गावात दोन लग्नं होती. एक धोंडे पाटलाकडे व दुसरं गावकुसाबाहेर कांबळ्याच्या घरी. झालंच तर गावातल्या एका फुटकळ पिराची स्थानिक यात्रा उद्या सुरू होणार होती. त्यासाठी अनाळ्याच्या मशिदीचा मौलवी आजच गावात आला होता. त्याचा मुक्काम शेख बद्रुद्दीनकडे होता. किरकोळ म्हटले तरी हजार - पांचशे लोक बकरी, कोंबडं कापायचे. साऱ्या मुसलमान आळीत यावेळी उत्साहाचं वातावरण असायचं.

 पुन्हा आज अनेक कुटुंबांना पाणी मिळालं नव्हतं. कारण वाढत्या उन्हामुळे बरंचसं पाणी विरून जायचं किंवा वाफ होऊन जायचं. पण आज साऱ्या गावातल्या गृहिणीमध्ये समाधानाचं वारं पसरलं होतं. कारण आज टँकरच्या चार खेपा झाल्या होत्या.

 सकाळी सकाळीच धोंडे पाटलाकडे गावकोतवालानं खबर धाडली की, सामुदायिक विहिरीत बायजा रात्री केव्हातरी पडून मरण पावली. रात्रीतून टँकरने पाणी ओतल्यामुळे तिचं प्रेत तट्ट फुगून पाण्यावर आलं होतं.

 या बातमीनं धोंडे पाटलांचं टकुरं चांगलंच गरम झालं. मळ्यातली विहीर आटल्यामुळे पाण्याचा वांधा होता. कालच पाहुणेरावळे आले होते. तालुक्याहुन पाण्याचा टँकर मागवणं जिकिरीचं, खर्चाचं काम होतं.

 'गाढवीचीला ह्योच टाइम मिळाला वाटतं तडफडायला...' त्यांचा त्रागा खदखदत होता, ‘सालीनं अपशकुन केला लग्नकार्याला...!'

 काही वेळानं त्यांनी हाक मारली, 'लेका नाम्या, काढ बुलेट आन् जा तालुक्याला समोर घालून टँकर घेऊन ये. सोता भेट विंजनिअरसायेबांना...

कंडम / १०७