पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘पुरे हो... एवढा अगोचरपणा तरुण वयात शोभत नाही...' आपल्या अंबाड्याला हिसडा देत पाटलीणकाकू म्हणाल्या व त्यांनी जरा जोर लावूनच रहाट ओढला आणि एकदम त्या मागे घसरल्या. त्यांच्या हातातून दोर निसटला आणि कळशी गडगडत विहिरीत जाऊन पडली. त्याचबरोबर कच्चा झालेला रहाटही निखळून विहिरीत गडप झाला.

 ‘आई 5 गंऽ' पाटलीणकाकूचा विव्हळण्याचा आवाज ऐकून चव्हाणांची सून पुढे सरसावली. तिनं हात देऊन त्यांना नीट उठवलं व बाजूच्या कड्यावर बसवलं. त्यांची कंबर धरली गेली होती. त्याचवेळी त्यांच्या दोन्ही सुना रिकाम्या घागरी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या आधाराने पाटलीणकाकू घराकडे चालत्या झाल्या.

 आता साऱ्यांचं लक्ष रहाटाविना ओकाबोका वाटणा-या विहिरीकडे गेलं. ती विहीर अर्धी कच्ची बांधली गेली होती. रहाटाविना पाणी काढणं कठीण होतं.

 'आता गं बया काय करायचं?' बारडकरांची आवडाबाई म्हणाली, 'ही विहीर कच्ची हाय. त्याच्या बांधावर उभं राहून पाणी शेंदणं धोक्याचं वाटतं....'

 ते साऱ्यांना पटलं होतं, पण पाणी तर हवं होतं. पुन्हा ऊन वाढत होतं. पाणी आटायला किती वेळ लागणार? प्रत्येकीच्या मनात शंका, प्रश्न भिरभिरत होते. घरची कामंही खोळंबली होती. पाणी हा त्यांच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होऊन राहिला होता.

 त्यांची सोडवणूक केली ती पुन्हा चव्हाणांच्या सुनेनं. ‘मावशीबाय, असं म्हणलं तर पाणी नाही मिळायचं. सावधपणे वाकून लहान कळशीनं पाणी शेंदता येईल....'

 आणि मग एकाच वेळी विहिरीच्या चहूबाजूंनी गोळा होत बायकांनी आपापले दोर कळशीला बांधून विहिरीत लोटायला सुरू केली.

 डोळ्यांवर हात धरून बायजानं आपल्या अधू नजरेत आभाळात चढत जाणारा सूर्य साठवायचा बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर दृष्टीला भान आलं आणि ती गुडघ्यावर हाताने जोर देत कष्टपूर्वक उठली आणि पालाच्या झोपडीत शिरली.

कंडम / १०१