पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काल रात्री टँकरच्या दोन खेपा झाल्या होत्या. सारं पाणी गाव च्या मारुती देवळाजवळील बहात्तरच्या दुष्काळात अर्धकच्ची खोदलेल्या विहिरीत ओतलं होतं व आज सकाळपासून पाणी नेण्यासाठी बायकापोरांची झिम्मड उडाली होती.

 पाणी क्षणाक्षणाला संपत होतं व सा-याच बायांना धास्ती वाटत होती की, आपली पाळी येईपर्यंत पाणी संपलं तर पुन्हा संध्याकाळपर्यंत वाट पाहणं आलं. पुन्हा टँकर वेळेवर येईलच याचा भरवसाही नव्हता. भर मे महिन्यातील चटके देणारे उष्ण दिवस व रात्री-तहान भागवायलाही पाणी पुरत नव्हतं.

 पण टँकरचं येणारं पाणी मर्यादित असल्यामुळे गावच्या सरपंचानं मागच्या आठवड्यात मीटिंग घेऊन फर्मान काढलं होतं, की घरटी चार कळशाच पाणी घ्यायचे; पण याला त्याचं, मालीपाटलाचं आणि तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटीवर सदस्य असलेल्या सखोबा भुजबळ माळ्याचं घर अपवाद होतं. त्यांच्या घरच्या बाईमाणसानं व गड्यानं केव्हाही यावं, नंबर नसताना लागेल तेवढं पाणी भरावं हा शिरस्ता साऱ्यांनीच निमूटपणे मान्य केलेला.

 काल रात्री उशिरा आलेला टँकर प्रथम आपल्या वाड्यासमोर उभा करून पाईपनं घरी पाणी भरल्यामुळे सरपंच वहिनी आज विहिरीवर नव्हत्या हे नशीब! तसंच भुजबळ अक्कासाहेब भाचीच्या लग्नासाठी मार्डीला गेल्यामुळे येणार नव्हत्या. साऱ्या बायकांना त्यामुळे हायसं वाटत असतानाच पाटलीणकाकू आल्या व त्यांचे पाणी भर काही संपेना. आज त्या नेहमीपेक्षा जास्तच पाणी नेत होत्या, तेव्हा माहिती घेण्यास जोशांच्या सरलाबाईनं विचारलंसुद्धा' 'काय पाटलीणकाकू आज काही विशेष :

 'होय जोशीणबाई. रात्री आमदार व इतर मंडळी जेवायला येताहेत- ग्रामपंचायत इलेक्शन जवळ आलीय ना.... आणि त्यांनी वाक्य अर्धवटच सोडलं होतं. त्यातून त्यांना त्यांच्या घराचं राजकीय महत्त्व व्यक्त करायचं होतं.

 'ते ठीक हो... पण आम्हालाही जरा पाणी मिळू द्या.' चव्हाणांची मॅट्रिकपर्यंत शिकलेली सून फटकळपणे म्हणाली, 'तुमचा मान मोठा; पण आम्हालाही पाणी द्या. आमच्याही घरी पाण्याचा ठणाणा आहे.'

 तिथं जमलेला साऱ्याच बायांना चव्हाणांच्या सूनबाईचं बोलणं मनोमन पसंत पडले होते. कारण पुन्हा पुन्हा त्यांच्या नजरा विहिरीतल्या कमी होणा-या पाण्याकडे धास्तावल्याप्रमाणे जात होत्या.

पाणी! पाणी!! / १००