पान:परिचय (Parichay).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४ । परिचय
 

 एका शिलालेखात कोरक्याने सम्राटाचे नाव कोरताना त्याची युवराज असतानाची बिरुदे सम्राट झाल्यानंतरही चुकून वापरली असा तर्क केलेला आहे (पृष्ठ ८३). दुसऱ्या एका शिलालेखात सिंघणदेव युवराज असतानासुद्धा सम्राटपदाची बिरुदे त्यामागे लावली गेली असा उल्लेख आहे (पृष्ठ १५). याचा अर्थ मला तरी एवढाच कळतो की, या बिरुदाचा त्या त्या ठिकाणी आपल्याला सुसंगत उलगडा करता येत नाही. आपण कोरक्याने चुका केल्या असाव्यात अशी अनुमाने करणे धोक्याचे आहे. शिलालेखातील लेखाच्या बाबतीतसुद्धा शुद्धाशुद्ध ठरविणे कठीण असते. अनेक शिलालेखांत 'श्री, च्या ऐवजी स्री कोरलेले असते. जो शिलालेख निष्काळजीपणामुळे अशुद्ध आहे असे आपण म्हणतो, त्या शिलालेखात आणि जो शिलालेख आपण अशुद्ध म्हणत नाही त्या शिलालेखात दोनही ठिकाणी शके हा शब्द सकु असा कोरलेला असतो. कोरके तत्कालीन रीतीप्रमाणे उच्चार कोरीत आहेत, की तत्कालीन रूढ प्रादेशिक उच्चार कोरीत आहेत, की कोरताना स्वतःचा निष्काळजीपणा, अडाणीपणा दाखवीत आहेत, हे सांगणे कठीण आहे. तत्कालीन शिलालेखांत ठिकठिकाणी न ऐवजी ण येतो, श ऐवजी स येतो. या बाबी जैनमहाराष्ट्रीय अपभ्रंशांचा प्रभाव किती प्रमाणात सांगतात आणि किती प्रमाणात अशुद्धपणा दाखवतात हे सांगणे सोपे नाही. या सर्व मतभेदांना समर्पक उत्तरे असतील ती मला माहीत नाहीत इतकेच माझे म्हणणे.
 प्रा. ब्रह्मानंद देशपांडे यांनी शिलालेखाच्या क्षेत्रात, इतिहास विवेचनाच्या क्षेत्रात आणि संशोधनाच्या क्षेत्रात आता आपले स्थान पक्के रुजविले आहे. रित्ती आणि मिराशी यांच्यासारख्या दिग्गजांना त्यांनी योग्य त्या ठिकाणी सुधारणा सुचविलेल्या आहेत व त्यांनी इतरांची मान्यता मिळविली आहे. तेव्हा आता ते नवखे नाहीत. या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून मान्य होत आहेत.



 (शोधमुद्रा- ले. प्रा. ब्रह्मानंद देशपांडे. अलकनंदा प्रकाशन, औरंगाबाद.)