पान:परिचय (Parichay).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८० । परिचय

 मला वाटते खरा वाद आचार्य म्हणजे शंकराचार्य की कुमारिल भद्रहा नाही. त्या दोघांपैकी एक अगर दोघेहीजण मिळून नरकात गेले तरी वाद शिल्लक राहतोच. समजा उद्या मी म्हटले ब्राह्मण नरकात गेला. आणि कारण असे दिले की, तो जुगारी होता. तर मग आक्षेप वर्णावर राहत नाही. व्यक्तीपुरता मर्यादित होतो. हिंसा हे पाप आहे. हिंसेच्या पापामुळे नरकात जावे लागते. ही भूमिका घेतल्यानंतर शंकराचार्यांचे अद्वैती वेदप्रामाण्य आणि कुमारिल भट्टांचे कर्मप्रधान द्वैती वेदप्रामाण्य दोन्ही आक्षेपार्ह राहत नाहीत. फक्त आक्षेप राहतो तो हिंसेपुरता. हा मुद्दा महानुभावांना अवैदिक ठरविणारा आहे की नाही ? मध्वसंप्रदायाचे कर्मठ अनुयायी शंकराचार्यांना असुर मानतात. संकर करणारे मानतात. वेगळ्या भाषेत हे आचार्यांना नरक असेच सांगणे आहे. पण त्यामुळे मध्वांना कुणी अवैदिक म्हटलेले नाही. ज्या ज्या वेळी महानुभावांना बहिष्कृत करण्याचा उपद्व्याप झाला त्या त्या वेळी त्यांनी शंकराचार्यांकडून मान्यता मिळविण्याचा प्रयास केला. हा प्रयासच महानुभाव स्वत:ला अवैदिक मानत नसत याचा पुरावा आहे. आपल्या धर्मजीवनाची हीच विलक्षण तऱ्हा आहे की, ज्यांना वेदाचा अधिकार नाही असा आमचा आग्रह आहे आणि ज्यांना वेदाचा अधिकार नाही असेही ज्यांचे स्वतःचे मत आहे तेही वैदिकच आहेत. महानुभाव मराठा आणि महानुभाव ब्राह्मण यांचे बेटीव्यवहार नसतात. महानुभाव ब्राह्मण व इतर वैदिक ब्राह्मण यांचे मात्र बेटीव्यवहार असतात. हेच महानुभाव मराठा समाजाचेही चित्र आहे. धर्मसंप्रदायाहून इथे जात बलवान आहे. आणि दोघांनाही वेदावर आधारित स्मृतींचा कायदा लागू ही वास्तवता समोर ठेवली तर महानुभावांना हिंदू तर मानणे भाग आहे, वैदिकही मानणे भाग आहे. कोणतेही आणि कितीही आचार्य नरकात गेले तरी याबाबत बदल होत नाही. मी महानुभावांना वैदिक मानतो आणि सर्व वैदिकांनी वेद गुंडाळून ठेवणे जरुरीचे आहे असे मानतो.
 संशोधन क्षेत्रातील सर्व वादांचे स्वरूप असेच आहे. प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांना हा सारा वाद एखाद्या किरकोळ मुद्द्यावर चालू आहे असे वाटते. पण तो किरकोळ मुद्दा एखाद्या प्रदीर्घ विवेचनाचा आरंभबिंदू असतो. 'महानुभाव हे वैदिक की अवैदिक ?' हा खरा मोठा वादविषय ! ह्या विषयाच्या चर्चेचा आरंभ 'आचार्य कोण ?' या मुद्दयापासून अनेकजण करतात. कधी कधी तर असेही दिसून येते की, वादविषय मुख्य प्रतिपादनाचा आधार आहे, हीही समजूत भ्रामकच आहे. तत्त्वज्ञानात शिरून सांगायचे तर भ्रम काही कर्माला कमी प्रवृत्त करतो असे नाही.


 हाच प्रकार 'उत्तर गीते' विषयी आहे. मराठीत 'उत्तर गीता' या नावाचे