पान:निर्माणपर्व.pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व कामगारांना बेकारीच्या खाईत ढकलणारे, गिरण्यामधील नफेखोरीवर आधारलेले उत्पादनतंत्र आणि अंतर्गत यंत्रणा बदलायला लावली पाहिजे. हे होत नसेल तर कामगारांना गिरण्यांचा ताबा घ्यायला प्रवृत्त केले पाहिजे व या कामगारसंचालित गिरण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचे आश्वासन ग्राहक चळवळीने दिले पाहिजे. खादीचे पुनरुज्जीवन आजच्या काळात जसेच्या तसे शक्य नाही. आवश्यकही नाही. परंतु त्यामागचा विचार ध्यानात घेऊन संपूर्ण कापड धंद्याचीच पुनर्घटना करण्याची मागणी कालानुरूप ठरेल, त्याप्रीत्यर्थ होणारी चळवळ नवीन व क्रांतिकारकही मानली जाईल. असा सगळा दूरदृष्टीचा विचार करून ग्राहक चळवळीचा पुढचा टप्पा निश्चित केला जावा. ती केवळ भाववाढ–महागाईविरोधी चळवळ न ठेवता, अर्थव्यवस्थेला इष्ट ते वळण देणारी चळवळ म्हणून उभारली जावी. अशी उभारणी वास्तविक कामगारसंघटनांकडून अपेक्षित आहे. पण आज या संघटना आपले क्रांतिकारकत्व हरवून बसल्या आहेत. ग्राहक चळवळीने हे निशाण आता आपल्या खांद्यावर घ्यावे-काळ फार अनुकूल आहे.

नोव्हेंबर १९७४



ऑपरेशन लक्ष्मीरोड । ९७