पान:निर्माणपर्व.pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'कमला मिलची तिसरी पाळी बंद झाली. श्रीराम मिलची पाळी ६ डिसेंबरपासून बंद करण्यात येईल अशी नोटीस लावण्यात आली आहे. ब्रॅडबरी मिल बंद पाडण्याच्या मार्गावर आहे व आजच अर्धीअधिक गिरणी बंद झालेली आहे.

 'फिनिक्स, हिंदुस्थान मिल, क्राऊन मिल, इंदू ग्रुप इत्यादी गिरण्यात खातीच्या खाती बंद करून सर्व बदली कामगारांना महागाईच्या काळात रस्त्यावर फेकण्यात आले आहे...'

 या बेकारीविरुद्ध कापड गिरणीकामगारांच्या संघटना जो काही लढा देतील तो हवाच आहे. परंतु ग्राहक चळवळीलाही हे एक आव्हानच आहे. कापडाचे भाव तर उतरले पाहिजेत पण कामगारही बेकार होता कामा नये, अशी या चळवळीची यापुढील मांडणी हवी. नाहीतर ग्राहक चळवळ कामगारविरोधी आहे असा खोडसाळ प्रचार करण्याची एक आयतीच संधी विरोधकांना मिळेल व सुरुवातीपासूनच चळवळ धोक्यात येईल, तिची वाढ खुटेल. 'ऑपरेशन लक्ष्मीरोड ' मध्येही हा एक अंतर्विरोध होता. झगमगाट कमी करा, भाव खाली आणा असे ग्राहकांनी म्हटल्यावर मालकांनी आपल्या दुकानातील नोकरवर्गाकडे वक्र दृष्टीने पाहायला सुरुवात केली. असे अंतर्विरोध प्रत्येक चळवळीत असतात. सुरुवातीला नसले तरी पुढे उत्पन्न होतात. चळवळीची उद्दिष्टे स्पष्ट असली तर हे अंतर्विरोध कमी करण्याचे मार्गही निघत राहतात. म्हणूनच पुण्यात सुरू झालेल्या ग्राहक चळवळीला आपली उद्दिष्टे आणि ती गाठण्याचे मार्ग यासंबंधी काही निश्चित भूमिका यापुढे घ्यावी लागणार आहे. मिळालेले यश कमी नाही, खूप उत्साहवर्धक आहे. पण पुढची वाटचाल अधिक कठीण आहे, गुंतागुंतीची आहे. केवळ उत्साह व संघटनाकौशल्य या वाटचालीत पुरेसे ठरणार नाही. विषम अर्थव्यवस्थेच्या मर्मावर आघात करण्याची क्षमता चळवळीत यावी, हे जर ग्राहक चळवळीचे अखेरचे उद्दिष्ट असेल तर उत्पादकांशी लवकरात लवकर नाते जोडण्याचा प्रयत्न व्हायला हवा; मग तो उत्पादक खेड्यातील कापूस पिकवणारा शेतकरी असो की शहरातील कामगार असो. कामगार, शेतकऱ्याला बरोबर घेऊनच चळवळीची पुढची वाटचाल व्हायला हवी. मालक जर गिरण्या बंद करीत असतील, कामगारांना रस्त्यावर फेकीत असतील तर ग्राहक चळवळीने कामगारांच्या पाठीशी उभे राहून शक्य ती दडपणे आणली पाहिजेत. त्यांच्या नफेखोरीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,

निर्माणपर्व । ९६