पान:निर्माणपर्व.pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सध्याच्या परिस्थितीत हा एक निष्फळ स्वप्नरंजनाचा विषय ठरतो हे खरे; पण असे वाटते की, येथील मध्यमवर्गाला आकर्षित करणारी कट्टर राष्ट्रवादी भूमिका व खेड्यापाड्यातील गरीब शेतकऱ्यांना, शेतमजुरांना उद्योग मिळवून देणारा जहाल आर्थिक कार्यक्रम यांची बेमालूम सांगड घालणारा एखादा अभिनव पर्याय अशा क्रांतिकारक नेत्याने जनतेसमोर स्वातंत्र्योत्तर काळात ठेवला असता आणि जनतेनेही या पर्यायाचा उत्स्फूर्त स्वीकार केला असता, विजयश्रीची माळ या नेत्याच्या गळ्यात घातली असती. आर्थिक मागण्यांमध्येच गुंतून राहिलेला कामगारवर्ग या पर्यायात कदाचित सुरुवातीला आघाडीवर दिसला नसता. पण यामुळे काही बिघडत नव्हते. मार्क्सचे पोथीबंद अनुयायी फार तर अस्वस्थ झाले असते. पण पर्याय सिद्ध झालेला पाहिल्यावर त्यांनीही पोथ्यातून हवे तसे नवे अर्थ काढून दाखविले असते. लेनिनपेक्षाही हा पर्याय माओ, हो चि मिन्ह यांच्या अधिक जवळ जाणारा आहे. पण हिंदुस्थानात कदाचित हाच पर्याय लागू पडला असता, अजूनही पडण्याची खूप शक्यता आहे. पण यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ताबडतोब अशा क्रांतिकारक पक्षाने फाळणीविरोधी भूमिका घ्यायला हवी होती. शक्य त्या मार्गाने फाळणी मोडून काढण्याच्या उद्योगास हात घालायला हवा होता. कारण फाळणी हा भारतीय राष्ट्रवादाचा एक फार मोठा पराभव आहे आणि या पराभवाची खंत येथील बहुसंख्य जनतेच्या मनात अजूनही फार खोलवर घर करून आहे. बांगला देश मुक्त झाल्यावर येथील राष्ट्रभावनेला केवढे उधाण आले हे सर्वांनी पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. या उधाणाचा अर्थ व या भावनेची ताकद आपल्याकडील डाव्या क्रांतिकारक म्हणवणाऱ्या पक्षांनी अजूनही नीटशी ध्यानात घेतलेली दिसत नाही. या भावनेचा एकीकडे परिपोष करीत असतानाच दुसरीकडे समतावादी आर्थिक व सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणीही व्हायला हवी होती. शहरांपेक्षाही या अंमलबजावणीसाठी खेडेभाग हा अधिक अनुकूल होता. गांधीजींच्या खेड्यात चला या मंत्राला नवीन कलाटणी देऊन हे सर्व साधता आले असते. मध्यमवर्ग व शेतकरीवर्ग या दुहेरी चालीमुळे एकत्र आणता आला असता, चळवळ शहरात आणि खेड्यात पसरत राहिली असती. कामगारवर्ग केव्हातरी या प्रक्रियेत ओढला गेला असता हे निश्चित, कारण तोही समाजाचा एक घटकच आहे- इतर घटकांशी जोडला गेलेला, अनेक धाग्यादोऱ्यांनी एकत्र बांधला गेलेला. पण तोच नेतृत्व करील अशी वाट पहात बसणे हा भाबडेपणा आहे, मार्क्सवादाचा हा आंधळा स्वीकार आहे. मूळ मार्क्सवादी क्रांतीत शेतकरीवर्गाला स्थान नाही. लेनिनने ते प्रथम दिले आणि माओने तर या वर्गाला आघाडीवर आणून ठेवले. हिंदुस्थानात मध्यमवर्गाबाबत असेच, मार्क्सवादी क्रांतीला अभिप्रेत नसलेले स्थानांतर घडू शकले असते-अजूनही ही शक्यता दृष्टिआड करता येत नाही. असे सर्व वर्ग एकत्रित करीत करीत व्यापक आघाडी उभी करणे,प्रस्थापित राज्यकर्त्यांना जनतेपासून अलग पाडणे, हीच सर्व यशस्वी क्रांत्यांची पूर्वशर्त असते.

निर्माणपर्व । ९०