पान:निर्माणपर्व.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 कुठल्याही दोन देशांची परिस्थिती तंतोतंत कधीही एकसारखी नसते, तेव्हा चीन आणि भारत यामधील परिस्थिती वेगळी होती, हे चीनमधल्या देदिप्यमान यशाचे व भारतातील दारूण अपयशाचे काही निर्णायक कारण ठरू शकत नाही. नेतृत्त्व या घटकाचा एक वेगळा, स्वतंत्र परिणाम यशापयशाला कारणीभूत ठरत असतो. जबरदस्त इच्छाशक्ती व सत्ताकांक्षा असलेल्या नेत्याचे इतिहासघडणीतील स्थान गृहीत धरावे लागते. चीनमध्ये माओ निर्माण झाला; हिंदुस्थानात माओच्या तोडीचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाला लाभले नाही; त्यामुळे दोन्हीकडच्या यश:सिद्धीत एवढे अंतर पडले. आपल्याकडे जातीभेद आहेत, भाषाभेद-प्रांतभेद आहेत, धार्मिक व सांस्कृतिक विविधता आहे. चीनमध्ये हे भेद, ही विविधता नव्हती असे काहीजण म्हणतील. भारतात गेली दीडशे वर्षे एकछत्री अंमल होता व आहे. चीनमध्ये राजकीय फुटाफूट होती, हेही चीनमधील यशाचे व आपल्याकडील अपयशाचे एक कारण म्हणून पुढे केले जाईल. पण या सर्व कारणांवर टिळक मात करू शकले, गांधी-नेहरूंनी मात केली. आपल्याकडील अफाट दारिद्रय, सामाजिक विषमता यामुळे तर कम्युनिस्टांना अशी मात करणे टिळक-गांधीपेक्षाही वास्तविक अधिक सोयीचे होते. शिवाय विसाव्या शतकातील एका अत्यंत प्रभावी व विजिगिषु तत्वज्ञानाचा वारसा त्यांना लाभला होता. काही अनुकूल असे जागतिक हितसंबंध, आंतरराष्ट्रीय लागेबांधे निर्माण झालेले होते. तरीही कम्युनिस्ट पक्ष येथे नामोहरम व्हावा, राज्यकर्त्यांनी टाकलेल्या चार तुकड्यांवर जगत राहण्याची नामुश्कीची पाळी या पक्षावर— या विचारसरणीच्या संघटनांवर यावी, याला श्रेष्ठ नेतृत्त्वाचा अभाव याशिवाय दुसरे कोणते कारण असू शकते ? मार्क्सवादात हे कारण चपखल बसत नाही हे खरे; पण इतिहासाने या कारणाची सत्यता व महत्त्व आजवर अनेकदा निदर्शनास आणलेले आहे. लेनिन नसता तर रशियन क्रांती यशस्वी होऊ शकत नव्हती. असे श्रेष्ठ नेतृत्व भारतीय कम्युनिस्टांना लाभले नाही, हे खरे हिंदुस्थानातील कम्युनिस्टांच्या ससेहोलपटीचे मुख्य कारण आहे. डांगे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा त्याग, बुद्धिमता, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांची एकेकाळची लोकप्रियता व कामगार वर्गावरील पकड याविषयी कुणीही आदरच व्यक्त करील. तेलंगणचा लढा, नक्षलवादी उठाव, इत्यादी चळवळींचे क्रांतिकारकत्वही कुणी अमान्य करणार नाही. प्रश्न आहे, या सर्व ठिणग्यांचे ज्वालेत रूपांतर का होऊ शकले नाही ? हे सगळे निखारे लवकर विझून का गेले ? महान् नेतृत्वाचा अभाव याशिवाय दुसरे कारण या शोकांतिकांमागे दिसत नाही.

 खरोखरच येथे लेनिन, माओ, हो चि मिन्ह यांच्या तोडीचा एखादा अव्वल दर्जाचा क्रांतिकारक, भारतीय कम्युनिस्टांना नेता म्हणून लाभला असता तर त्याने नेमकी कोणती धोरणे अंगिकारली असती? डावपेच कसे योजले असते? समाजातील विविध वर्गांची , गटांची, जातीजमातींची एकजूट कशी बांधली असती ?

हिमालयाच्या अलीकडे आणि पलीकडे । ८९