पान:निर्माणपर्व.pdf/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 "आमचे प्रतिनिधी थेट बिहारमध्ये जाणार आहेत अन् तिथे अन्नछत्र उभारणार आहेत. म्हणजे असं पाहा की, आपण दिलेला प्रत्येक पैसा बिहारी माणसाला निश्चित मिळणार. पैसे खाल्ले जाण्याची शक्यता यामुळे अजिबात नाही !'

 ...चेहे-यावर प्रसन्नतेचं साम्राज्य असे ! आठ्यांचा मागमूस नसे ! !

 "आपल्याला 'माणूस' माहीत असेल ?"

 "कोण माणूस ? "

 "अहो, असं काय करता? 'माणूस' साप्ताहिक माहीत नाही काय ? त्याचा आम्हाला पाठिंबा आहे ! करता ना मदत ? "

 ...ओठांतून नकळत एखादं स्मित घरंगळत बाहेर पडे आणि मग फक्त पाकीट उघडल्याचा आवाज होई...नोटा बाहेर निघत. पावती फाडली जाई. पैसे देणाऱ्याच्या चेहेऱ्यावर समाधान पसरे; पावती देणाऱ्याचा चेहरा आनंदात फुलून येई. दोघांनाही एका बिहारी माणसाला एक महिना वाचवण्याचा आनंद मिळे! ...

 हे असं रविवारी दुपारपर्यंत चाललं होतं. दुपारी कामगारांनी जेवण दिलं... तितक्याच आपुलकीनं ! तीन वाजता शेवटची फेरी झाली. पाच वाजता काम थांबलं. डॉक्टरांकडे चहा झाला. भेळेवर सर्वजण तुटून पडले ! सर्वांचा प्रेमानं निरोप घेऊन, जमलेले एकवीसशे रुपये बरोबर घेऊन, आम्ही चाळीसजण उत्साहानं परतलो... पुण्याकडे ! !

 ...अखेर पुणे स्टेशन आलं. दोन दिवसांच्या सतत श्रमानं दमलो होतो. पाऊल उचलणं जड जात होतं. वीरांगना अतिशय थकल्या होत्या... तरीदेखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता...लोकांबद्दल कृतज्ञता होती आणि हे सर्व पैसे बिहारी माणसाला पोहोचविण्याच्या जबाबदारीची जाणीवदेखील होती! !


 रविवार दिनांक २७ मे. या दिवशी पहिली चार विद्यार्थ्यांची तुकडी सिकंदराबाद एक्स्प्रेसने निघालीही. अनिल अवचट, रवींद्र गुर्जर, अनिल दांडेकर आणि अरुण फडके. पुणे स्थानकावर या तुकडीला निरोप देण्यासाठी या चौघांचे नातेवाईक, मित्र आणि यूथ ऑर्गनायझेशनचा तमाम जथा जमला होता. माधवराव पटवर्धन होते, इंदिराबाई मायदेव होत्या, भाऊसाहेब नातू होते आणि श्री. ग. माजगावकरही.

निर्माणपर्व । ७८