पान:निर्माणपर्व.pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 शनिवारी रात्री काम थांबलं आणि आम्ही आमच्या (!) निवासस्थानी परत आलो. तर तिथं कारखान्यांतील अधिकारी आमची वाट पाहत होते. प्रत्येकाकडे एकेक जण दिला गेला. त्यांच्या घरी जेवायला गेलो. तिथं तर पंक्तीचाच थाट होता. रांगोळ्या घातल्या होत्या. दोन्ही वेळेला पहिल्या वाफेचा भात, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या अन् शिवाय वर गोडाचं पक्वान्न ! ' दिवसभर हिंडून थकला असाल, आता पोटभर जेवा, संकोच करू नका,' असा प्रेमळ आग्रह. घरांतील लहान मुलंदेखील उत्साहानं प्रश्न विचारीत. बरोबर फिरण्याचा हट्ट धरीत. पोटभर जेवल्यावर चांदण्यात रमत रेंगाळत गप्पा मारीत येण्यात फार मौज आली अन् दिवसभरात एक हजार रुपये जमल्याची वार्ता कळल्यानं प्रसन्नतेची अन् उत्साहाची जी लाट पसरली, तिचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे.

 रविवार सकाळ उजाडली ती वेगळ्याच वातावरणात ! दोन बॅचेस पाडल्या गेल्या. एक बॅच गेली खंडाळ्याला. अन् दुसरी चालत निघाली खंडाळ्याकडे–वाटेतले बंगले गाठीत. काही जण खूप माहिती विचारत, बराच वेळ गप्पा मारीत अन् काहीच देत नसत. काही जण म्हणत, तुमची बडबड नको. पैसे हवेत ना ? मग हे घ्या पैसे ! काही म्हणत आमचा तुमच्यावर विश्वास नाही. पण तुम्ही इतक्या लांब आलात... मोठ्या घरचे दिसता...तर हे घ्या पैसे ! एका हॉटेलमधील मालकाने पैसे देण्याचे नाकारले. पण केवळ ३३ पैश्यांनी एका बिहारी माणसाला एका दिवसाचे अन्न मिळेल हे कळल्यावर तेथील वेटर्सनी आठ-आठ आणे दिले. मग त्या मालकाला काय वाटलं कुणास ठाऊक, पण त्याच्या नावाने अकरा रुपयांची पावती फाडली गेली !!

 कोणी कसाही असला तरी आमचा प्रचार चालूच होता. वीस मुलं आणि तितक्याच मुली शांतपणे माहिती सांगत...पैसे गोळा होत...कुठेही गडबड नव्हती ..गर्दी नव्हती. सगळे पद्धतशीर चालू होतं. बोलण्याची पद्धतदेखील ठरली होती.

 "माफ करा."

 "काय ?" कपाळावरच्या सतराशे साठ आठ्यांतून प्रश्न उमटे...

 "आम्ही पुण्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एक युवक संघटना स्थापन केली आहे, आणि बिहारमधील भुकेल्यांसाठी आम्ही मदत गोळा करीत आहोत. आमच्यापैकी काही इंजिनिअरिंगचे, मेडिकलचे, स. प. चे, तर काही फर्ग्युसनचे, कॉमर्सचे विद्यार्थी आहेत."

 त्या व्यक्तीच्या कॉलेजचे नाव आलं की आठ्यांची संख्या सतराशेवर येई !

बिहार परिवार । ७७