पान:निर्माणपर्व.pdf/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.



बंधूंच्या आवाक्याबाहेरचे आहे. ती रक्कम मदत म्हणूनच मिळणे जरूर आहे. जमीन सुधारणा व अन्य भांडवली खर्च यासाठी जे सुमारे एक लक्ष पसतीस हजार रुपये लागतील ते 'श्री विठ्ठल संयुक्त शेती सहकारी सोसायटी'ला दीर्घ मुदतीचे हलक्या व्याजाचे कर्ज म्हणून हवे आहेत. हे कर्ज विविध बँका व आर्थिक संस्था यांच्याकडून मिळू शकेल. पण या संस्थांचे व्याज आमच्या संस्थेला आजच्या घटकेला परवडणार नाही. या व्याजापायीच संस्था दुर्बल बनेल अशी भीती आहे.
 यासाठी आम्ही आपल्याला मदतीचे आवाहन करीत आहोत.
 आपण सोसायटीला देणगी देऊ शकाल किंवा दीर्घ मुदतीच्या कमी व्याजाच्या ठेवी देऊ शकाल. या ठेवी संस्था ५ ते १० वर्षात परत करील.

 म्हैसाळच्या सोसायटीत जी शंभर हरिजन कुटुंबे सहभागी झालेली आहेत, ती येत्या पाच वर्षात दुधाच्या धंद्यावर स्वावलंबी होतील अशी कल्पना आहे. त्यांना मदत म्हणून दिली जाणारी रक्कम वीस वर्षांत वसूल केली जाईल. या हप्त्यांमुळे सोसायटीकडे जमणारी रक्कम दरवर्षी दूध उत्पादनाचे नवीन गट निर्माण करण्यासाठी खर्च केली जाईल. यामुळे गावातील सर्व दोनशे हरिजन कुटुंबांना येत्या काही वर्षात कामधंदा मिळेल व ते स्वत:च्या पायावर उभे राहतील, अशी अपेक्षा आहे. म्हैसाळनंतर इतर गावे निवडून तेथेही या पद्धतीने काम करण्याची कल्पना चालकांसमोर आहेच.'

 नामवंत मंडळींचा पाठिंबा संस्थेमागे हळूहळू उभा राहत आहे. या नामवंतात समाजातील विविध थरातील, विविध विचारांचे लोक एकत्रित आलेले आहेत, हा कांबळे-देवल यांच्या विधायक कार्यकौशल्याचा एक पुरावाच म्हटला पाहिजे. हे कौशल्यच त्यांना यशाचे शेवटचे टोक गाठून देणार आहे हे उघड आहे. हे टोक थोडे लवकर गाठले जाईल, इतर समाजघटकही थोडे फार हलले, कार्यप्रवृत्त झाले तर. ते होतील अशी आशा आहे.

जुलै १९७१
निर्माणपर्व । ६८