पान:निर्माणपर्व.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



काही सावकरांनी हरिजनांच्या शब्दावर विश्वास टाकून पैसे चुकते होण्यापूर्वीच जमिनींचे ताबे सोडून संस्था उभारणीला मदत केली आहे. ही देणी अद्याप बाकी आहेत. हरिजनांनी या सावकारांना आंगठा दाखविला तर ते आता हतबल आहेत, कायदेशीररीत्या ते काही करू शकत नाहीत, हे खरे आहे. 'आम्ही इकडे आमच्या तुटपुंज्या पगारातून संस्थेला मदत करायची. आणि तिकडे आधीच गबर असलेल्या सावकारांची घरेच भरायची नं ? हा काय सामाजिक न्याय आहे?' असा युक्तिवाद काहींनी केलाही. पण युक्तिवाद म्हणूनही हा तितकासा बरोबर नाही. ज्या लहानसहान जमीनमालकांनी, सावकारांनी हरिजनांवर विश्वास टाकून, गावात काही चांगले घडते आहे म्हणून, पैसे पदरात पडण्यापूर्वीच जमिनी सोडल्या त्यांना टांग मारायची आणि ज्यांनी रोकडा व्यवहार म्हणून अगोदरच पैसे वसूल करून घेतले त्यांच्या निष्ठुर स्वार्थबुद्धीला प्रतिष्ठा व यश मिळवून द्यायचे, हा तरी कुठला आला आहे सामाजिक न्याय ? शिवाय मुख्य प्रश्न दानतीचा आहे. वैयक्तिक व सामाजिक नीतिमत्तेचाही आहे. कुणीतरी, कुठेतरी, दिलेला शब्द पाळण्याची जोखीम स्वीकारणार नसेल, तर सामाजिक अनीतीचे दुष्टचक्र केव्हाच थांबणार नाही. म्हैसाळचे हरिजन ही जोखीम नाकारू इच्छित नाहीत, या प्रवृत्तीचे वास्तविक सर्वानी स्वागतच करायला हवे आहे.

 संस्थेच्या उभारणीकार्यात प्रथमपासूनच जाणवणारी ही नैतिकता आज विशेषच मोलाची आहे. सावकारशाही नष्ट व्हायला पाहिजे, विषमता हटली पाहिजे, हे सर्व खरेच आहे. त्यासाठी जे व्यापक प्रयत्न हवेत, आंदोलने हवीत, ती जिथे जिथे होत आहेत - त्या सर्वांचे स्वागतच आहे. पण येथे प्रश्न मर्यादित आहे. दोनशे हरिजन कुटुंबे आपल्या पायावर, आपल्याच पुरुषार्थबळावर उभी राहू पाहत आहेत. इतर समाजाचा दु:स्वास, द्वेषमत्सर न करता. हक्कांच्या जाणीवेबरोबरच कर्तव्याची जबाबदारी ओळखण्याची, झीज सोसूनही ती पार पाडण्याची त्यांची हिंमत आहे. या परिस्थितीत उर्वरित समाजघटकांनी त्यांचेकडे तटस्थ भावनेने, केवळ कौतुकानेही पाहत न राहता, त्यांच्या धडपडीला सक्रीय प्रोत्साहन देणं, हे सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. हरिजनांचा हा प्रकल्प नावारूपाला आला तर आसपासच्या इतरही दहा-पाच गावातून त्याचे इष्ट परिणाम जाणवणार आहेत. आजच शेजारच्या सलगर गावातील हरिजन शेतमजूर या प्रयोगाकडे आकर्षित झालेले आहेत. पण चालकांचा सध्याचा आग्रह आहे मूळ पायाच प्रथम भक्कम करण्याचा. या पायाभरणीत सर्वांनी सामील व्हावे यासाठी संस्थेच्या वतीने एक आवाहनही प्रसृत झालेले आहे. या आवाहनपत्रकात शेवटी म्हटलेले आहे :

 ‘इतरांच्या पैशाने हरिजनांना पोसावे अशी संस्थेची कल्पना नाही. हरिजनांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. पण गहाण जमिनी सोडवून घेण्यासाठी जो एक लक्ष रुपये खर्च आलेला आहे तो देणे हरिजन-

म्हैसाळ । ६७