पान:निर्माणपर्व.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



पुण्याहून आलेल्या पाहुण्यांचा परिचय वगैरे कार्यक्रम पार पडला. असतील एक साठ-सत्तर लोक. पाहुणे (संपादक माणूस) हरिजनांना प्रश्न विचारून माहिती घेत होते. कुणीच सलग चार ओळी उत्तर देत नव्हते. जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवीत होता. मळके कपडे, ओढग्रस्त चेहरे, दबलेले भाव; सरपंच व इतर दोन-चार प्रमुख गावकरी वगळता कुणीच म्हैसाळकर या सभेला उपस्थित नव्हते. तरुण चेहरेही दिसले नाहीत. स्त्रिया तर नव्हत्याच. सभा काही फुलेना. खोदून खोदून एखाद्याला विचारावे : पूर्वी तू काय जेवत होतास, हल्ली काय जेवतोस ? मुलं शाळेत जातात काय ? दारू कमी झाली का वाढली ? पुढे काय ठरवलं आहे ? सोसायटी चालू ठेवायची का आपलं पूर्वीचच बरं होतं ? देवल–कांबळे आज आहेत, उद्या नसतील. तुमच्यापैकी कोण कोण सोसायटीचे काम पाहायला पुढे येणार ? कॉलेजपर्यंत शिक्षण झालेले दोन-चार हरिजन तरुण आहेत असे कळले. त्यापैकी आज कुणी कसे हजर नाहीत ? त्यांना या प्रयोगात गोडी वाटत नाही का ? -- अनेक प्रश्न. उत्तरे मात्र तुटक तुटक. मतितार्थ एवढा निश्चित. हल्ली या सर्व मंडळींना दोन वेळ पुरेसे जेवायला मिळते. सावकाराचा धाक वाटत नाही. पूर्वी असे नव्हते. वर्षातून काही महिने तरी उपास सहन करावेच लागत. अधून मधून मारहाणही होई. कर्जबाजारी तर सगळेच होते.

 आठवड्याकाठी दोन-दोन, तीन-तीन दिवस उपासमार ही माणसं कशी सहन करीत असावीत ?

 अशाही पिळवटलेल्या स्थितीत, कधीकाळी घेतलेल्या दोन-चारशे रुपयांच्या कर्जफेडीसाठी सावकाराघरी वर्षानुवर्षे ही माणसे कशी राबत असतील ?


 देवल या पिळवणुकीचे एकेक नमुने माणूस कचेरीतील बैठकीच्या वेळी उपस्थितांना सांगत होते. ऐकूनसुद्धा कुणाचा त्यावर विश्वास बसू शकत नव्हता. शिरूभाऊ, यदुनाथ यांनी मध्येच अडवून विचारले देखील ! ‘हरिजनांची संख्या गावात तशी काही कमी नाही. सावकार-जमीनदारांची मारहाण या मंडळींनी सहन तरी का केली ?'

 पिढ्यानुपिढ्या खाली मान घालून वावरणारा हा समाज. साध्या पिण्याच्या पाण्यासाठीही गावकऱ्यांवर अवलंबून असलेला. पायात बळ नाही. पोटांत अन्न नाही. कशाच्या जोरावर प्रतिकार करणार ? एखाद्याने केला तरी बाकीचे त्याला साथ देणार नाहीत. सावकारी कावे काही थोडे का असतात ? प्रतिकारासाठीसुद्धा थोडी संघटित ताकद, आर्थिक बळ असायला हवे. सध्यातरी सहकारी प्रयत्नातून हे बळ जेवढे वाढविता येईल तेवढे वाढवायचे. हरिजनांना, गरीब शेतमजुरांना, हक्काचा बारमाही उद्योग आणि प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची,

म्हैसाळ । ६५