पान:निर्माणपर्व.pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



वर्षातून चार महिने उपासमार सहन करावी लागणाऱ्या कुटुंबापर्यंत विषमता पचवून जगत असलेले हे गाव. निषेधाचा साधा सूर कधी पाच-पन्नास वर्षात गावात उमटला नाही, तर प्रतिकार-विरोधाचे नावच नको. उपासमार, कर्जबाजारीपणा, यातून उद्भवणारी गुलामगिरी-मारहाण हा पिढनुपिढयांचा वारसा इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही बिनतक्रार, निमूटपणे भोगला जात होता. वर सगळी आबादीआबाद होती. तळ बर्बादीत बुडालेला होता.

 या तळाकडेच देवलांचे लक्ष प्रथम गेले. वर्ग संघर्षाची ठिणगी येथे पेटवून देणे शक्य होते. पण देवलांनी दुसरा मार्ग पत्करला. हरिजनांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा, त्यांना आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. सरकारी आणि सहकारी संस्थांचे लाभ हरिजनांच्या पदरात बांधण्यासाठी त्यांनी आपल्या संघटनविद्येचे कौशल्य पणास लावले. आपल्याजवळची माया या कामासाठी खर्च केली. सचोटी व हिंमत म्हणजेच पत हे तत्व डोळ्यासमोर ठेवून म्हैसाळ दूध पुरवठा सोसायटी तळापासून व्यवस्थित बांधून काढली. पत नाही म्हणून बँकांचा उपयोग नाही, बँका नाहीत म्हणून पुन्हा सावकाराचे पाय धरण्याशिवाय गत्यंतर नाही, हे गरीब शेतमजुराला, हरिजनाला भेडसावणारे दुष्टचक्र त्यांनी विश्वासाच्या बळावर मोडून काढले. नाहीतर कोण देतो हरिजनांना उत्तम प्रतीच्या म्हशी विकत घेऊन ? कुठलेही तारण नसताना ? आधीच कर्जात बुडालेले हरिजन. त्यात अज्ञान, दैववाद, फाटाफूट, द्वेषमत्सर यांचा बुजबुजाट. शेळीसुद्धा आपल्या दारात बांधण्याची स्वप्ने या समाजाने कधी पाहिली नव्हती. म्हशी आल्या तेव्हा धारा काढण्याचे शिक्षण या मंडळींना देण्यापासून सुरुवात करावी लागली. असा सगळा शेंडीपासून संन्याशाच्या लग्नाची तयारी करण्याचा मामला होता. कसोटी देवलांची होती आणि आबा पिरू कांबळे यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची होती. एकीकडे आपल्या बांधवांना नवीन जबाबदारी पेलण्याचे शिक्षण द्यायचे, त्यांचा आळस, संशय, अविश्वास झटकायचा, दुसरीकडे गावातील हितसंबंधितांनी आणलेल्या अडथळ्यांनाही तोंड द्यायचे; अशा दोन्ही आघाड्यांवर या मंडळींना झगडावे लागत होते. पण गडी बहादुर ठरले. सावकाराघरचे शिळेपाके ताक सटीसामासी भाकरीबरोवर चाखू शकणाऱ्या हरिजन कुटंबाच्या दाराशी, मालकीची, निदान एकेक म्हैस तरी बांधली गेली. एका वेळच्या दुधाचे पैसे घरी ठेवायचे, दुसऱ्या वेळच्या दुधाच्या पैशातून कर्ज फेडायचे, अशी सोसायटीने घालून दिलेली शिस्त कटाक्षाने पाळली गेल्यामुळे एकीकडे कर्जफेड होत गेली व दुसरीकडे पावसाळ्यात, शेतमजुरीची कामे थंडावल्यावर, हमखास सहन करावी लागणारी उपासमारही टळली.

 म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या प्रशस्त खोलीत एका रात्री ही सर्व मंडळी जमली होती.

निर्माणपर्व । ६४