पान:निर्माणपर्व.pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




 हे दोन विरोधी प्रवाह गांधींच्या कालात पुढे बरेचसे एकत्र आले.आंबेडकरांनी आपले वेगळेपण जपले, पण ब्रिटिश आपला मित्र नाही, हेही ओळखले. म्हणूनच एकीकडे त्यांनी बौद्धधर्मही स्वीकारला आणि दुसरीकडे भारतीय घटनेचे शिल्पही तयार केले.

 हाच सुमार. टिळक-फुल्यांचा उदयकाल. देश रशिया. १८९२ च्या प्रारंभी रशियातील एका प्रांतात ( समारा ) दुष्काळ पडला. रशियन शेतकरी असाच देशोधडीला लागत होता. लेनिनचाही हा उदयकालच होता. मार्क्सवादी अमृत प्राशन करून लेनिन ताजातवाना झालेला होता. तो या दुष्काळाची मीमांसा सांगू लागला --

  'या दुष्काळाला एक विशिष्ट समाजरचना जबाबदार आहे. जोपर्यंत ही समाजरचना कायम आहे, तोपर्यंत दुष्काळ पडणारच. आपण जर का ही समाजरचना नष्ट केली, तरच आपण हे दुष्काळाचे संकट कायमचे नाहीसे करू शकू. प्रचलित समाजरचना उधळून लावण्याच्या दृष्टीने दुष्काळाची मदतच होत आहे. कारण दुष्काळामुळे शेतकरी समाज खेडेगावातून उठून शहरांकडे निघाला आहे. आता शेतीप्रधान अर्थव्यवस्था कोसळणार आहे. शहरात गेल्यावर शेतकरी औद्योगिक कामगार होणार आहे. मग तेथे या वर्गाला भांडवलशाही रचनेचं खरं स्वरूप अनुभवावं लागेल. या अनुभवामुळे हा कामगारवर्ग एकदा जागृत झाला की, तो झारच्या जुलमी सत्तेला आव्हान देऊ लागणार आहे. हे सारं जितक्या त्वरेने घडून येईल तितका क्रांतीचा उषःकाल जवळ आलाच याची खात्री बाळगा.'

 वास्तविक दुष्काळाचा आणि भांडवलशाहीचा तसा काही अर्थाअर्थी संबंध नव्हता. भांडवलशाही देशातून दुष्काळाने केव्हाच पळ काढलेला होता व समाजवादी क्रांती होऊन दहा-वीस वर्षे उलटून गेली तरी रशिया-चीन या देशात दुष्काळ अधूनमधून डोके वर काढीतच होता. भांडवलशाहीमुळे शेतकरी विस्थापित होतो, पण हे नवे तंत्र योजनापूर्वक त्याने आत्मसात केले, तर लेनिनची भविष्यवाणी खोटीही ठरू शकते. चीनमध्येच ती एका अर्थाने खोटी ठरली. माओने रशियाप्रमाणे सरसकट शेतीचे सामुदायिकीकरण न करताच चिनी शेतकऱ्याला गर्तेतून वर काढले. आपल्याकडे गांधीही हेच करू मागत होते. फक्त चरखा हा ट्रॅक्टर बॉयलरशी सामना करायला फार दुबळा ठरला. पण आज फूले-टिळक, लेनिन यांच्यापेक्षाही आपल्या शेतकऱ्याला माओ-गांधीची धोरणे व कार्यक्रम अधिक मार्गदर्शक व उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. दुष्काळ हा नैमित्तिक आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील असमतोलाचा तो परिणाम आहे. असे असमतोलाचे अधूनमधून उद्भवणारे प्रसंग सहजासहजी निभवून नेण्याइतपत

२८ नोव्हेंबर । ६१