पान:निर्माणपर्व.pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



काही प्रसंगी तर ती मवाळांपेक्षाही अधिक ब्रिटिशधाजिणी ठरली. हाच आगरकर-फुल्यांमधीलही एक मतभेदाचा मुद्दा होता. उलट, 'अहो ! काठीला बांधायला सोने शिल्लक राहिलेच आहे कुठे मुळी ! साहेब सगळेच सोने विलायतेत घेऊन चालला आहे' - असा प्रतिपक्ष मांडून टिळकांनी आपला वेगळा आखाडा काढला.

 एकमेकांविषयी आदर असला तरी टिळक, फुले यांचे जमणे शक्यच नव्हते. कारण दृष्टिकोनात मूलभूतच फरक होता. टिळकांचा शत्रू हा अनेकदा फुल्यांचा मित्र ठरत होता. फुल्यांच्या शत्रुस्थानी असलेल्या वर्गाचे हितसंबंध टिळकांकडून वरचेवर जपले जात होते. तरीही एक गोष्ट जाणवते, टिळकांनी मवाळांना जसे ठोकले, सुधारकांवर टिळक जसे घसरले तसे फुल्यांवर घसरलेले दिसत नाहीत.

 आज असे म्हणायला हरकत नाही की, दोघेही कमीजास्त प्रमाणात चुकतच होते.

 टिळक साठ टक्के बरोबर ठरले. बैलाचा आणि हत्तीचा पाय हिंदी जनतेच्या उरावर होता, असे मानले, तर हत्तीचा पाय प्रथम काढू म्हणणाराच अधिक बरोबर ठरला, यात आश्चर्य काही नाही. टिळकांची चळवळ मनूच्या माशाप्रमाणे वाढत गेली. सुराज्यापेक्षा स्वराज्याची ओढ जनसामान्यांना, तेल्यातांबोळ्यांना अधिक वाटली, हे पुढील इतिहासानेच दाखवून दिले आहे.

 फुले चाळीस टक्के बरोबर होते. रयतेवर उच्चवर्णियांचा, भटसंस्कृतीचा शेठ–सावकारांचा बोजा आहे; परकीय इंग्रज सत्ता हा येथील जनतेच्या छाताडावरचा मोठा हत्तीचा पाय असला तरी दुसरा स्वदेशी शोषकांचा बैलाचा पाय दृष्टिआड करून चालणार नाही, या पायाच्या दाबातूनही रयतेला मोकळे करणे अवश्य आहे; मोठ्या लढाईच्या अंतर्गत ही छोटी लाढाईही खेळण्याची तयारी ठेवली पाहिजे, निदान तिला विरोधी भूमिका घेऊन तरी चालणार नाही, ही एक स्वच्छ जाणीव टिळकांनी मोकळेपणे व्यक्त केलेली दिसत नाही. ही त्यांची चूक होती. त्यांच्या प्रतिपादनातील एक मोठीच उणीव होती.

 दोघांच्याही या कमीजास्त चुका, दृष्टिकोनातील फरक, परिस्थितीमुळे, पूर्वसंस्कारांमुळे, आपल्याकडील जातीय तटबंदीमळे पडलेला असावा. कारण काळ जसजसा पुढे सरकला, तसतसा, उभयतांच्या भूमिकेत इष्ट तो बदल घडत गेलेला दिसतो. देवाने सांगितले तरी अस्पृश्यता मानणार नाही असे टिळक शेवटी शेवटी म्हणू लागले होते. मजूरवर्गाच्या उदयाकडेही ते आशेने पाहात होते. फुल्यांच्या चळवळीत ब्राह्मण मंडळींचा प्रवेश होऊ लागला होता.


निर्माणपर्व । ६०