पान:निर्माणपर्व.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 आदिवासींची आंदोलने तशी लवकर उभी राहतात असा एक अनुभव आहे. आदिवासी समाजाचा भावनाप्रधान स्वभाव हे या मागील एक कारण असू शकते. शिवाय आदिवासींची विशिष्ट समाजरचनाही लक्षात घ्यावी लागते. मुखिया किंवा नायक याचे स्थान कुटुंबप्रमुखासारखे असते व जमातीचा बराचसा कारभार या कुटुंबप्रमुखाच्या इच्छेप्रमाणे चालू असतो. ओरिसात कोरापुट जिल्ह्यात असे काही नायक विनोबांच्या यात्रेमुळे ग्रामदान आंदोलनात ओढले गेले व हा विचार, हा कार्यक्रम फारसा समजावून वगैरे न घेता, या मुखियांनी आपापला टापू ग्रामदान म्हणून घोषित करून टाकला. ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या सामूहिक धर्मांतराची कथाही काहीशी अशीच होती. नायकाने ठरवले ख्रिस्ती व्हायचे. हजारपाचशे लोक, दहा-पाच गावे एकदम ख्रिस्ती झाली. पुन्हा नायकाचा विचार फिरला. मूळ धर्मात सगळे परत आले. शहरीकरण जसजसे पसरते आहे तसतसे हे नायकप्रामाण्य कमी होत आहे हे खरे, पण मूळचा स्वभाव काही एकदम बदलत नाही. आदिवासी जमात ही अजूनही आपल्या नायकाभोवती चटकन गोळा होते. भावनेच्या भरात एखादी सामुदायिक कृतीही क्षणार्धात घडून जाते.

 महाराष्ट्रापुरते पाहायचे तर आदिवासी समाजाचा पुरुषार्थ जागृत करून, त्यांना माणूस म्हणून उभे करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न ठाणे जिल्ह्यात श्रीमती गोदावरीबाई परुळेकर यांनी पंधरा-वीस वर्षांपूर्वी केला. ही वस्तुस्थिती आता सर्वमान्य झालेली आहे. आचार्य भिसे यांचीही या क्षेत्रातील कामगिरी महनीय आहे हे नाकारून चालणार नाही. गोदावरीबाईंनी आदिवासीला लढाऊ राजकारणात खेचून आणले. आचार्यांनी या समाजाला नवीन विद्या दिली. पण एक उणीव या सर्व प्रयत्नात राहून गेली. आदिवासी हा आदिवासी म्हणून अलग राहिला. दलितांच्या किंवा श्रमिकांच्या व्यापक चळवळीशीसुद्धा आदिवासी चळवळीचा सांधा शेवटपर्यंत जोडला गेला नाही. वारल्यांनी बंड केले, एक तेजस्वी इतिहास घडला, पण लवकरच हे प्रकरण इतिहासजमाही झाले. एक कोंडी फुटली, आदिवासीला जनावराप्रमाणे जे जीवन जगावे लागत होते ते संपले. पण नवीन कोंडी तयार झाली. पंधरा-वीस वर्षे उलटली तरी ही नवीन कोंडी फुटू शकलेली नाही. डहाणू-उंबरगाव भागात झालेले कार्य आसपास पसरले नाही. आदिवासींच्या इतर जातिजमातीही या प्रभावापासून तशा दूर राहिल्या. मुंबईतील कामगार, इतर दलित समाज तर फारच दूर. कदाचित ही आपल्या सर्वच चळवळींची मर्यादाही असावी. प्रादेशिक, भाषिक, आर्थिक किंवा जातीय कोंडीत चळवळ अडकून राहते. व्यापक अधिष्ठान तिला प्राप्त होत नाही. डॉ. आंबेडकरांची चळवळ तरी सर्व दलित जनतेला कुठे एकत्र आणू शकली ? गोदावरीबाईंच्या कामगिरीचा विचार करताना हा व्यापक संदर्भ व मर्यादा म्हणूनच दष्टिआड करून

आश्रमनगर ! ५५