पान:निर्माणपर्व.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 आजवरची मोहिम तर यशस्वी झाली होती शहाद्यातील आदिवासींना जमिनी तर मिळाल्या होत्या. पण मोहिमेचा सेनापती, या भूमुक्ती आंदोलनाचा नेता लढाईत कामास आला होता. गड मिळाला पण सिंह गमवावा लागला.
 असे मरण तरी किती जणांच्या भाग्यात असते ? लढाईतले मरण ! हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् ..
 अंबरसिंगला हे मरणभाग्य लाभले आहे..



 पांढरी चादर. त्यावर निघताना कुणीतरी वाहिलेली कण्हेरीची ताजी फुले.
 आतले निश्चेष्ट, गोठलेले, थंड शरीर.
 ही प्रथा का पडली असावी !
 प्रेतावर ही प्रसन्नतेची पखरण कशासाठी ?
 मृत्यूची भीषणता कमी जाणवावी म्हणून !
 मरण दु:खदायक आहे, पण जीवन तरी कुठे थांबते आहे ?
 लांबरुंद पांढया चादरीवर तांबडी फुले हसतातच आहेत.
 न जायते म्रियते वा कदाचित् ..



 कल्लोळ. लाटा. बेभान शोक.
 किंचाळ्या. आक्रोश. हंबरडे.
 शववाहिनी शहाद्यात पोचली होती.

 असे वेढून टाकणारे दु:खदृश्य यापूर्वी कधी पाहिले नव्हते. अशा गदारोळात कधी सापडलो नव्हतो. ऐकले होते, वाचले होते, की आंबेडकरांच्या वेळी लक्षावधी अनुयायी असेच धाय मोकलून रडले, महाशोक उसळला-सागरासारखा.

 तो सागर मुंबईला उसळला होता. हा एक महाराष्ट्राचा कोपरा होता- हाच काय तो फरक.

 लाटांवर लाटा. दुःखाच्या, शोकाच्या. कार्यकर्ते गांगरून गेले. कसा आवरायचा हा समुद्र !

 लोंढे येतच राहिले. चहू दिशांनी. बातमी पसरली गेली तसतसे शहाद्यातून, आसपासच्या गावातून, लांबलांबहून. वाहनांनी, पायी, धावतपळत, हातातली कामे टाकून, जेवणखाण सोडून.

 कुणी आल्या आल्या जमिनीवर कोसळत. मातीत गडबडा लोळत. मिठ्या मारमारून कुणी हंबरडत. कपाळ बडवीत. छात्या पिटत.

शहादे । ५१