पान:निर्माणपर्व.pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 आता निवडणुका आलेल्या आहेत. हे सर्व संपल्याचे, थांबल्याचे वरवर तात्पुरते दिसेल. पण मुळात काही बदल होणार नाहीत. कारण चार निवडणुका होऊन गेल्या, पक्ष आणि माणसे बदलली तरी असा मूळबदल काही झालेला नाही.
 हा मूळबदल, आदिवासींची, उपेक्षित जनतेची अस्मिता आणि सामुदायिक पुरुषार्थ जागृत होईल तेव्हाच घडून येणार आहे.
 या आत्मपुरुषार्थाशिवाय सगळे बाहेरचे आहे, उसने आहे, कृत्रिम आहे.


 बहिष्कार ही पुरुषार्थ जागृतीची एक प्रारंभिक अवस्था आहे.
 छळाकडून बळाकडे जाण्याची ही एक पहिली पायरी आहे.

 निवडणुका जवळ आल्यामुळे साहजिकच मतदानावर बहिष्कार टाकून आपल्या उपेक्षेकडे, हालअपेष्टांकडे, छळवादाकडे बाहेरच्या जगाचे लक्ष वेधावे असा विचार या भागातील- विशेषतः शहादे भागातील आदिवासी जनतेमध्ये मूळ धरू पहात आहे.

 शहादे तालुक्यापुरती ही कृती मर्यादित आहे, फार लहान आहे, म्हणून ती दुर्लक्षणीय मात्र ठरू नये. कारण या लहानशा सामुदायिक कृतीने आदिवासी आपला गमावलेला आत्मविश्वास परत मिळवू पाहात आहे.

 आजवर त्याने मते विकली. दोन-चार रुपयांसाठी. दारूच्या एका बाटलीसाठी.

 आज तो या मोहांवर विजय मिळवून हे मत साभार परत करायला निघालेला आहे. या लोकशाहीचा, या तथाकथित कायद्याच्या राज्याचा आमच्या दैनंदिन जीवनाला कसलाही स्पर्श नाही; ही लोकशाही व तिचे कायदे आम्हा गोरगरिबांना कसलेही संरक्षण देऊ शकत नाही, हे तो आज प्रथमच संघटितपणे सांगत आहे.

 एका शहादे मतदारसंघापुरतेच हे सांगणे आहे, फार तर दहा-वीस हजार मूक जनतेचा हा मौन प्रतिकार आहे म्हणून तो डावलला जाऊ नये.

 कारण डावलला गेलेला फारफार डावीकडे झुकण्याचा धोका असतो आणि असा धोका लोकशाहीला परवडण्यासारखा नसतो.

फेब्रुवारी १९७२
शहादे । ४९