पान:निर्माणपर्व.pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



घटनांवरून या भागापुरते तरी सहज सिद्ध करणे शक्य आहे-सलसाडीनंतर चारच दिवसांनी घडलेली ही एक घटना नमुना म्हणून पाहण्यासारखी आहे

 रात्री आठचा सुमार होता. शहाद्याच्या ग्रामस्वराज्य समितीच्या कचेरीत एक पन्नाशीच्या जवळपासचा आदिवासी आला. काही वेळ बसून, काही वेळ निजून आणि काही वेळ चक्क जमिनीवर गडबडा लोळून त्याने आपली कर्मकहाणी तेथे असलेल्या कार्यकर्त्यांना सांगितली. कार्यकर्त्यांनी ती सलगपणे लिहून काढली. माणूसकडे पाठवून दिली. दोन वकील, दोन पत्रकार, एक डॉक्टर असा ताफा तडक शहादे मुक्कामी पोचला. कहाणीची सत्यासत्यता पुन्हा एकदा पडताळून पाहण्यात आली. सर्वांची अशी खात्री पटली, की आदिवासी सांगतो आहे ते खरे आहे. पोलिसांनी केलेला छळवाद भयंकरच अमानुष आहे. कायद्याचा त्याला कुठलाही आधार नाही. पण कायद्याच्या चौकटीत राहून या अन्यायाचे निराकरणही होऊ शकत नाही. पुरावा कुठून, कसा आणायचा ?

 कहाणी अशी आहे-

 ग्रामस्वराज्य समिती शहादा, जिल्हा धुळे.
 अर्जदार : आवल्या पवल्या (माळचे) भिल, राहणार मनरद, ता. शहादा, जिल्हा धुळे.

 मी मनरद शिवारातील शिरूडकडील मनरद व शिरूड या विभागातील पीक संरक्षण सोसायटीचा वॉचमन आहे. पाच वर्षांपासून वॉचमनचे काम करीत आहे. माझ्या शिवारातील श्री. त्रिंबक हरी पाटील, राहणार मनरद यांचे शेतातील S 4 कंबोडिया कपासाचे पीक चोरी गेल्याचे आरोपावरून मला पोलीस स्टेशन शहादा येथे आणण्यात आले. तुम्ही गुन्हा कबूल करून घ्या असे पी. एस. आय. म्हणत होता. मी म्हणालो, मला माहीत नाही. मी स्वतः रखवालदार असून मी चोरी कशी करणार. एवढे ऐकून पोलीस सब-इन्स्पेक्टर याने वीज लावली. वीज लावल्यामुळे मला खूप शारीरिक त्रास झाला. खूप वेदना झाल्या. तोंडाला कोरड आली. अंगाला आग सुटली. त्या आगीमुळे शरीर जळू लागले. मी मोठमोठ्याने ओरडुन रडू लागलो. पाया पडू लागलो. तेव्हा त्यांना दया आली. वीज काढली. परत शिवीगाळ करून विचारपूस केली. खरे सांगून दे. मी म्हणालो, मला माहीत नाही. परत पी. एस्. आय्. ला राग आला. त्याने पोलिसांना मला पकडायला लावले. परत माझ्या हातांना वीज लावली. माझ्या अंगातील अग्नी भडकला. शरीर जळू लागले. सर्व अंगात आग भडकू लागली. तोंडाला परत खूप कोरड पडली. दाह वाढत होता. शरीरातील अग्नी एके ठिकाणी बसू देत नसे. सारखी ऊठबस लोळणे करावे लागत होते. स्थिरता नाही. नंतर मी ओरडलो. परत वीज काढली. नंतर पी. एस. आय. ने विचारले. खरे सांग, कपाशी कोणी चोरली?

शहादे । ४७