पान:निर्माणपर्व.pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



स्मृती





कै. दामोदरदासजी ( भाऊ ) मुंदडा व अंबरसिंग सुरतवंती या दोघा सर्वोदयी कार्यकर्त्यांमुळे मी धुळे जिल्हयातील, सातपुड्यातील अक्राणी महालात प्रथम गेलो. सर्वोदयातील अन्त्योदयाचा मूळारंभ आणि राष्ट्रवाद या दोन प्रेरणांचा मला अभिप्रेत असणारा समन्वय या दोघांमध्ये झालेला होता. म्हणून त्यांच्या स्मृतीस हे 'निर्माणपर्व' अर्पण.

पुढे अखिल भारतीय स्तरावर जयप्रकाशांची चळवळ उभी राहिली. या चळवळीतही हे दोन विचार प्रवाह एकत्र आलेले होते. त्यामुळे या चळवळीकडेही मी आकृष्ट होणे, तिच्यात सहभागी असणे स्वाभाविक होते. साधारणत: १९७० ते १९८० असा हा कालखंड. या पुस्तकातील सर्व लेख या कालखंडातील आहेत, चळवळीची एक जीवंत पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. 'आणीबाणी ' विरोधही यात अर्थातच समाविष्ट आहे.

'अन्त्योदयमूलक राष्ट्रवाद' हे या लेखांमागील समान विचारसूत्र आहे.

'श्रीग्रामायन' या माझ्या पुस्तकात ग्रामीण भारतात मी केलेल्या भ्रमंतीचा ‘स्वैर' अंश थोडा अधिक आहे. या भ्रमंतीमागील उद्देश व आशय अधिक स्पष्ट करणारे हे 'निर्माणपर्व' आहे. ' शहादे' ते ‘जसलोक ' असा हा प्रवास-किंवा प्रवासाचा हा एक टप्पा !

श्री. ग. माजगावकर