पान:निर्माणपर्व.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिशेने आपले मोर्चे बांधण्यास काहीच हरकत नाही. दमन आणि नमन यामधला वमन हाही प्रकृतिस्वास्थ्याचा, ‘अशांतिशमनाचा' एक उपाय आहे. मात्र भूदान समित्यांचे यासाठी जमीनवाटप समित्यांत ताबडतोब रूपांतर व्हायला हवे. दान याचा संविभाग हाच अर्थ विनोबांना अभिप्रेत आहे. पदयात्रा, शांतियात्रा काढून हे वाटपाचे, संविभागाचे काम होत नाही, असा गेल्या पंधरा-वीस वर्षांतील रोकडा अनुभव आहे. अशा एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून जमीनवाटपाच्या प्रश्नाची तड लावण्याचे सर्वोदयी कार्यकर्त्यांनी ठरवले तर भूदान-ग्रामदानाचे रुतलेले गाडे पुन्हा वर येण्याची शक्यता आहे. सर्वोदयी हे आपल्याकडील आद्य भूमिक्रांतिकारक आहेत हे 'माणूस' अगदी पहिल्यापासून सांगत आहे. नक्षलवादी नंतर आले. आणि राजकीय पक्ष तर काल-परवापर्यंत झोपलेलेच होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीस-पंचवीस वर्षांनी राजकीय पक्षांचे या मूलभूत समस्येकडे लक्ष गेले व लक्ष गेल्यावरही, मागील वर्षी, दिवस-दोन दिवस जमीन बळकाव आंदोलनाचा गहजब उडवून देण्यापलीकडे या विषयाचा अधिक पाठपुरावा करण्याची त्यांना गरज भासलेली नाही. सर्वोदयींनी ही आपली क्रांतिकारक आघाडी सोडू नये असे वाटते. हे या मंडळींचे स्वकष्टार्जित यश आहे व ते त्यांनी अधिक ठळक करण्याची आज आवश्यकता आहे.

 असे घडू लागले तरच शांतियात्रा या खऱ्या अर्थाने अशांतिशमन करणाऱ्या क्रांतियात्रा ठरतील. नाहीतर ती एक निरर्थक क्रिया, वरवरचा उपचार, टिंगलटवाळीचा विषय म्हणून ओळखला जाईल. उशाखाली विंचू असताना डोक्याला पट्टी बांधून झोपण्यात काय राम आहे ?

१४ ऑगस्ट १९७१

____________________________________________________________________________________________

वीज

____________________________________________________________________________________________


 दिनांक ३० जानेवारी १९७२. रविवार. ऐन दुपारची वेळ, शहादे येथील नदीकाठचे भिलाटी मैदान माणसांनी गजबजायला सुरुवात झाली होती. चारही दिशांनी माणसे थव्याथव्यांनी येत होती. पाहता पाहता हजार झाली. दोन हजार झाली. तीन तीनच्या रांगात सर्वजण उभी राहिली. लाऊडस्पीकरवरून सूचना मिळाली. मोर्चा सुरू झाला. वाटेत, वळणावळणावर आणखी माणसे सामील होत गेली. बहुतेकजण आपल्या गावाहून, दहाबारा मैलांवरून पायीच या मोर्चासाठी मेळाव्यासाठी आलेले होते. तासभर मोर्चा गावातील निरनिराळ्या रस्त्यांवरून फिरला.मूकपणे.

निर्माणपर्व । ३८