पान:निर्माणपर्व.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 'अहो कसले संरक्षण घेऊन बसलात ? आमचे आम्ही पाहून घेऊ. तुम्ही आमची चिंता मुळीच करू नका.'

 'ते शक्य नाही. आम्ही येणारच.'

 पोलीस ऐकत नाहीत हे पाहिल्यावर संयोजकांनी शांतियात्राच रद्द करून टाकली. पोलीस पहाऱ्यात शांतियात्रा याला काही अर्थच नव्हता.

 तरीही २-४ गावातून आम्ही नुसते हिंडलो. आमच्या जीपमागोमाग पोलीस जीपचा ससेमिरा होताच !

 मी हळहळ व्यक्त केली-पेट्रोलचा केवढा हा अपव्यय ? शिवाय एवढ्या पोलिसांचे जेवणाचे, प्रवासाचे भत्ते असतीलच.

 टेंबे मजेत होते. म्हणाले : ' अहो, हा तरी अनुभव केव्हा घ्यायचा ? साला मिनिस्टरच्या वर आपला रुबाब !'

 या रुबाबाचाही त्यांना कंटाळा आला. मग म्हणाले : 'यापेक्षा त्यांनी आपल्याला तालुक्यात यायलाच बंदी केली असती तर बरे झाले असते. साले, आपण ती बंदी मोडून सत्याग्रह वगैरे केला असता. थोडे Sensational तरी काही घडले असते. काय अनिल, तुरुंगातून सुटल्यावर धुळ्याला काही सत्कार,हारतुरे याची व्यवस्था ठेवली असतीस की नाही ?'

 अनिल गोटे हा देशदूतचा धुळ्यातील वार्ताहार. तोही आमच्याबरोबर चल म्हटल्यावर आलेला होता.

 दुसरे दिवशी ही देशदूतची जोडी परत गेली. दुपारी मी, अंबरसिंग, भाऊ मुंदडा, नानासाहेब देवरे, पाटणकर, गोविंदराव शिंदे, वगैरे मंडळी म्हसावदकडे निघालो होतो. आमची जीप वाटेतच बंद पडली. आमची जीप थांबल्यावर पोलीस जीपलाही थांबणे भाग पडले. जीपचा रागरंग पाहिला आणि आम्ही २-३ जण तसेच पायी सटकलो. पोलीस जीपसमोर एक बारीकसा पेचप्रसंग उभा राहिला. आमचा पाठलाग करायचा, की बंद पडलेल्या जीपवर व तिच्या दुरुस्तीची खटपट करणाऱ्या अंबरसिंग-भाऊ मुंदडा वगैरे लोकांवर पहारा ठेवायचा !

 पोलिसांनी दुसरा पर्याय स्वीकारला. तेवढीच २-४ तास आमची नजरकैदेतून सुटका झाली.



 लॉ अँड ऑर्डरवाल्यांचे पहारे असे दऱ्यायाखोऱ्यातूनदेखील भिडलेले आहेत. ठाणी बळकट आहेत.

शहादे । ३३