पान:निर्माणपर्व.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अंबरसिंगला अटक ! जामिनावर सध्या तो सुटलेला आहे. शहादे कोर्टात खटला सुरू आहे.

 -- दोन मे या दिवशी घडलेले पाटीलवाडी प्रकरण !

 --म्हसावद येथे त्याच दिवशी दुपारी उडालेली चकमक !

 अंबरसिंग. अंबरसिंग. या सगळ्यामागे अंबरसिंग चा हात आहे असे गुजर पाटील समाजाच्या पुढाऱ्यांचे ठाम मत आहे. शासनावरही या मताचा पगडा आहे.

 मग घटना घडून तीन-चार महिने झाले तरी या पाटीलवाडी- म्हसावद प्रकरणी अंबरसिंगला अटक का नाही ?

 बोटभर चिठ्ठीचाही पुरावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. खूप मारठोक झाली तरी आदिवासी अंबरसिंगचे नाव या प्रकरणी अजून तरी घेत नाही.

 या भागातील साखर कारखान्याचे चेअरमन व एक वजनदार काँग्रेसनेते श्री. पी. के. पाटील यांची माहिती मात्र वेगळी आहे. आम्ही त्यांना शहाद्याला त्यांच्या घरी भेटायला गेलो असता त्यांनी सांगितले : अटकेचे कागदपत्रे तयार आहेत. काही दडपणे ( Pressure ) येताहेत म्हणून कारवाई थांबली आहे एवढेच. अंबरसिंगचा या प्रकरणात निश्चित हात आहे ...वगैरे वगैरे.


 असे धरपकडीचे वारे वाहत असताना आम्ही या भागात पोचलो. मी आणि नासिक 'देशदूत'चे संपादक शशिकांत टेंबे.

 धुळ्यात पाऊल ठेवताक्षणीच आम्हाला निरोप. डी. एस्. पी. साहेबांनी भेट्न जायला सांगितले आहे.

 जिल्हा प्रसिद्धी अधिकारी श्री. ठोंबरे यांच्यामार्फत आम्ही कळविले : प्रथम हिंडून येतो. परतताना भेटतो.

 ठोंबरे यांनी पुन्हा निरोप आणला. डी. एस. पी. व कलेक्टर दोघांचीही विशेष इच्छा दिसली, की जाण्यापूर्वीच आपण त्यांना भेटावे.

 ठोंबरे गाडी घेऊनच आलेले होते. आम्ही कलेक्टरांच्या बंगल्यावर सकाळी पोचलो. (२२ जुलै १९७१)

 ' तुमचा निरोप मिळाला. पण तुम्ही ज्या भागात जाता आहात तिथली परिस्थिती काही ठीक नाही. तुम्हाला कल्पना असावी म्हणून मुद्दाम अगोदर बोलावणे पाठवले.'

निर्माणपर्व । ३०