पान:निर्माणपर्व.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भाईबंद खूष.
 इकडे अंबरसिंगने ज्या पोऱ्यावरून हे सगळे लाल्याप्रकरण उदभवले त्याच्या नावात मात्र थोडा बदल करून घेतला. पूर्वी तो शबीर धडा भिल होता. आता सर्वजण रघुवीर म्हणून त्याला ओळखतात, हाका मारतात.

 शबीरचा रघुवीर हा असा सहज होऊन गेला.


 गरीब-श्रीमंत, न्याय-अन्याय याची अंबरसिंगला झालेली जाणीव अधिक तीव्र होत चालली. दयेची याचना करण्याऐवजी हक्काची भाषा त्याच्या बोलण्या चालण्यात, लिहिण्यात अधिक स्पष्टपणे उमटू लागली. नागालँड, नक्षलवाद हे राजकीय शब्द तो अधून-मधून वापरू लागला. जमिनीची भूक जागी झाली. आंदोलनांचे इशारे तो शासनाला देऊ लागला. गेल्या वर्षीच्या मध्याला जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्राची भाषा पुष्कळच वेगळी उमटलेली आहे. अंबरसिंग लिहितो-

 पाडळदे गावाशेजारी चिखली नावाचे एक गाव आहे. त्याठिकाणी पूर्वो बेटसिंग नावाचा आदिवासी राजा होता. तो आता वारला आहे. त्या ठिकाणी श्री. सांवरसिंग बेटसिंग हा कारभार पाहात असतो. त्याच्या नावावर जवळ जवळ पंधराशे एकर जमीन होती. ती आज त्याचेजवळ राहिलेली नाही. आता त्या ( ठिकाणी ) जे बुद्धिवादी गुजर लोक राहतात ते ती खेडीत आहेत. वहितीला त्यांचेकडे आहे. ती आदिवासी राजांची जमीन आहे. तिच्यावर नियमाप्रमाणे आदिवासींचा हक्क आहे. ती आदिवासीला नियमाप्रमाणे वाटून द्यावयास पाहिजे. सरकारी यंत्रणाप्रमाणे आम्ही आदिवासी त्या जमिनीचा शेतसारा भरू. सरकारच्या अटी ज्या असतील ( त्या ) आम्हाला मंजूर आहेत. परंतु आमच्या आदिवासी राजांची जमीन आम्हा आदिवासी बांधवांना मिळणेस नम्र विनंती. या प्रकरणी तातडीने लक्ष घालाल अशी आशा आहे. योग्य मार्गदर्शन करून सुकर खुलासा करणेस नम्र विनंती. नाही ( तर ) आम्हा भूमिहीन आदिवासीला ज्या पडीत जमिनी असतील त्यांचे वाटप करावे. नाहीतर आमच्या आदिवासी राजांची जमीन मिळावयाला पाहिजे. हा धडधडीत अन्याय आमचेवर होत आहे. तो आता आम्ही सहन कसा करावा. या कामी आपले सहकार्य मिळणेस नम्र विनंती आहे. शेवटी वारसा हक्क सोडणार नाही. याकामी आपण आवश्य सहयोग द्याल ही विनंती आहे.

 चिखली गाव हे शहादे तालुक्यात आहे ....

 ८।८।७० ला आदिवासी भिल्ल सेवा मंडळाच्या कचेरीतून मुख्यमंत्री

शहादे । २३