पान:निर्माणपर्व.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 लाल्याला हा अपमान वाटला असावा. उत्तर देण्याऐवजी त्याने शिवीगाळीचे प्रमाण आणखी वाढवले.
 दोन्हीकडून लोक जमले. गर्दी वाढत चालली. पोलिसांपर्यंत वर्दी गेली.

 अंबरसिंग अजून शांत होता. लाल्याला तो पुन्हा एकदा म्हणाला : मी दोनदा तुला नीट विचारलं. हे तिस-यांदा, शेवटचं विचारतो आहे. या पोऱ्याला तू का मारलंस ? आता जर तू उत्तर दिलं नाहीस तर माझा माझ्यावरचा ताबा सुटेल. मग काय घडेल ते सांगता येत नाही....

 लाल्याला हा पोकळ दम वाटला असावा. त्याने आपला शिव्यांचा सपाटा आणखी वाढवला.

 अंबरसिंगने फाडकन् लाल्याच्या मुस्कटात ठेवून दिली.
 लाल्या चमकला. त्याचे दोस्तही जरा गडबडले. दिवसभरात केव्हातरी बघून घेऊ, म्हणून एकेक पाऊल मागे हटू लागले.
 पोलीसही एव्हाना पोचले होते. त्यामुळे गर्दी पांगली. परिस्थिती अधिक चिघळली नाही.
 पण वातावरण तंग होते. लाल्या आज अंबरसिंगला चाकू दाखवणार म्हणून अंबरसिंगचे बरेच लोक हत्यारानिशी अंबरसिंगच्या संरक्षणासाठी जमलेले होते.

 लाल्याचा फौजफाटाही सज्ज होता.
 अंबरसिंगला निरोप मिळाला, लाल्या चाकू परजून तयार आहे. अंबरसिंग केव्हा दिसतो याची वाट पाहत तो एका ठिकाणी बसलेला आहे.
 अंबरसिंगने आपल्या सगळ्या हत्यारी साथीदारांना बळे बळे घरोघर पाठवून दिले आणि तो एकटाच लाल्यासमोर जाऊन उभा राहिला.

 लाल्या सकाळीच थोडा नरमला होता. आता तर तो पुरताच गार पडला.

 पोलिसांनी निःश्वास टाकला. कारण दिवसभर परिस्थिती स्फोटक होती. दोन्हीकडचे लोक हत्यारे चालविण्यास मागेपुढे पाहणारे नव्हते. भिवंडी, जळगावच्या यादीत शहाद्याचे नाव दाखल होण्याची शक्यता होती.

 ही वेळ आली नाही याबद्दल अंबरसिंगला सर्वजण दुवा देत राहिले. अगदी शहाद्याचे मुसलमानही. काहीजण येऊन अंबरसिंगला म्हणालेही, तुम्ही होतात म्हणून आम्ही वाचलो. नाहीतर काय घडले असते सांगवत नाही.

 अंबरसिंगने शेवट मोठा छान केला. त्याने दुवा देण्यासाठी आलेल्या मुसलमान भाईबंदांना सांगितले : तुम्ही गरीब, आम्ही गरीब, आपण आपापसात लढाई करणं खराब काम आहे. नुकसान कुणाचं होणार ? आपलंच.

निर्माण पर्व । २२