पान:निर्माणपर्व.pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्षांचा अनुभव व संस्कार, यांचा हा परिणाम आहे. ब्रिटिश गेल्यावर नेहरूंनी ही येथील जनतेची मानसिक गरज पूर्ण केली व जनता पक्षाला हा वारसा काही चालवता आला नाही. आज तो इंदिरा गांधींकडे पुन्हा आला आहे. हा वारसा सांभाळून त्या प्रगतीकडे आगेकूच करतील की, देशाचा पुन्हा एक मोठा तुरुंग बनवतील, हे आज काही सांगता येत नाही. भाकिते तर खूप झालेली आहेत. यशवंतराव चव्हाण म्हणाले की, इंदिरा गांधी सत्तेवर आल्या तर निवडणुका पुन्हा होणारच नाहीत. हिटलर-मुसोलिनीप्रमाणे हुकुमशाही राजवट देशावर लादली जाईल, वगैरे. आता त्या राजरोस मार्गाने सत्तेवर आलेल्या तर आहेत, त्या हिटलर-मुसोलिनी ठरतात की, द गॉलप्रमाणे मर्यादित स्वातंत्र्याची हमी देऊन देश बळकट करतात, हे आज काय सांगणार ? दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. इंदिरा गांधींबरोबरच संजय-चौकडीही आलेली आहे. इंदिरा गांधी आणि ही चौकडी यात मूलभूत फरक आहे. इंदिरा गांधी हा देश कुणालाही विकणार नाहीत. अगदी रशियालासुद्धा. डांग्यांना म्हातारचळ लागला असे त्यांचे टीकाकार कितीही म्हणोत. पण इंदिरा गांधींचे त्यांनी केलेले विश्लेषण फारसे चूक नाही. इंदिरा गांधी या मूलतः साम्राज्यवादविरोधी शक्तींचे प्रतीक आहेत व गोरगरीबच नाही तर येथील राष्ट्रीय वृत्तीच्या मध्यमवर्गाचाही त्यांना याचसाठी आजवर पाठिंबा लाभत आलेला आहे. आणि साम्राज्यवाद तर आता आपल्या दाराशीच भिडला आहे. अफगाणिस्तानात रशिया घुसला आणि याचे निमित्त करून पाकिस्तानात अमेरिका हातपाय पसरायला सज्ज झाली. समर्थ आणि एकसंध भारत ही त्यामुळे आपली प्रधान गरज ठरली. अशीच गरज फ्रान्समध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाली होती व द गॉल पुढे आला. अमेरिका आणि रशिया या दोन्ही साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध त्याने फ्रान्सला खडे करून दाखविले. इंदिरा गांधींजवळ अशा प्रेरणा आहेत हे त्यांचे आजवरचे चरित्र पाहता कुणालाही मान्यच करावे लागेल. पण अशा प्रेरणा बन्सीलाल आणि शुक्लांजवळ आहेत का ? नाहीत, त्रिवार नाहीत. त्यामुळे त्या द गॉल ठरतात की, हिटलर-मुसोलिनी ठरतात, हे आजच काही सांगवत नाही.चौकडीच्या त्या गुलाम ठरल्या, विधीनिषेधशून्य राजकारणाची त्यांना कायम सवयच जडली तर विरोधकांनी तुरुंगाचा, भूमीगत चळवळीचा रस्ता आजपासूनच ओळखीचा करून ठेवायला हरकत नाही. त्यांच्या वडिलांपासून, लहानपणी त्यांना आकर्षित करणाऱ्या जोन ऑफ आर्कच्या चरित्रापासून त्यांना लाभलेल्या प्रेरणा जर प्रभावी ठरत गेल्या तर शक्यताही आहे की, त्या द गॉलप्रमाणे हा देश साम्राज्यशाही शक्तींच्या दडपणापासून वाचवू शकतील आणि त्यासाठी हिटलर-मुसोलिनीप्रमाणे देशाचा तुरुंग करण्याची, विरोधकांचे जीव घेण्याची किंमत मागणार नाहीत. अर्थात विरोधकांनीही लोकशाही-लोकशाही म्हणून राजकारणाचा चुथडा करण्याचे स्वातंत्र्य

निर्माणपर्व । २२२