पान:निर्माणपर्व.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 हरकत घेणारे तिकडे गेले. पण काही उपयोग नव्हता. कागदोपत्रीचा पुरावा विरुद्ध होता.
 दूसरा मार्ग दांडगाईचा. पण तो महागात पडण्याची भीती वाटत असावी. कारण गाठ होती येथे तिरकामठेवाल्या आदिवासींशी. त्यामुळे तिकडूनही बाजू बंद झाली.
 त्यामुळे धुमसले, धुमसले आणि एक दिवस हे प्रकरण आपोआप विझून गेले.
 शहादे गावात हे जरा वेगळे घडले. कारण येथे मुसलमानांची संख्या तशी बरीच आहे. सहसा त्यांच्या वाटेला कुणी जात नाही. या समाजाने कबरस्थान म्हणून बळकावलेल्या जमिनीवर आदिवासींनी आपली झोपडी उभी केली, या कृत्याकडे म्हणूनच थोडे विशेष कौतुकाने पाहिले गेले. मनातून अंबरसिंगला अनेकांनी धन्यवादही दिले.

 आणखीही एका प्रसंगी जरा वेगळे घडले.
 नवीन जागेत संस्थेची कचेरी सुरू झालेली होती.
 कुणी पाटी आणून लावली. कुणी टेबल दिले. खुर्ची अशीच कुठूनतरी आली. अंबरसिंग येऊन जाऊन काम पहात होता.
 एक दिवस कचेरीत किरकोळ कामे करणारा पोऱ्या रडत आला. अंबरसिंग होताच तिथे. त्याने विचारपूस केली. पोऱ्याने सांगितले ‘लाल्या' ने त्याला मारले म्हणून.
 लाल्या म्हणजे गावातला एक मुसलमान दादा. बराच वचक होता त्याचा. लोक त्याला भिऊन असत.
 अंबरसिंग मुलाला घेऊन लाल्याकडे आला.
 ‘लाल्या तू याला का मारलंस?'
 लाल्याने उत्तर न देता आईमाईवरून शिव्या द्यायला सुरुवात केली.
 हे बघ लाल्या, मीही तुला आईमाईवरून शिव्या देऊ शकतो. पण आपल्या दोघांच्या आयामाया इथे नाहीत. त्या लांब आहेत. त्यांना कशाला निष्कारण बोलवून आपण त्रास द्यायचा ? प्रश्न तुझा आणि माझा आहे. आपण तो मिटवून टाकू'-अंबरसिंग स्वर न चढवता लाल्याला समजवीत होता.
 लाल्या आणखीनच भडकला. त्याचे दोस्तही भोवती गोळा झाले.

 अंबरसिंगने पुन्हा एकदा पहिलाच प्रश्न शांतपणे विचारला, 'लाल्या, तू या पोऱ्याला का मारलेस ?

-२
शहादे । २१