पान:निर्माणपर्व.pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विद्युतउपविभागाचे अध्यक्ष पृथ्वीसिंह यांच्याकडे पत्रद्वारे अशी आग्रहाची मागणी केली आहे की, सरकारने राजगढ विद्युत उपविभागाचे सहाय्यक अभियंते भवानीसिंग कटेवा यांच्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी करावी. 'विद्युत विभागमे, राजगढमे बिना रिश्वत कुछ भी कार्य नहीं होता है. इससे नगरवासी काफी परेशान हैं', असे बातमीत पुढे म्हटलेले आहे.

 तरीपण भ्रष्टाचार कमी करण्याचे प्रयत्न जारीने सुरू आहेत. मुख्यमंत्री याबाबत विशेष दक्षता बाळगीत आहेत. मंत्रिमंडळात एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही, या गोष्टी विरोधकही नाकबूल करीत नाहीत.


 अचरोलला जाण्यासाठी दीड वाजल्यापासून तयार होऊन बसलो होतो. तीनला पोचायचे होते. लगेच कार्यक्रम सुरू होणार होता, पण जयपूरहून निघायलाच साडेतीन वाजले. वाटेत बी. डी. ओ. साठी गाडी थांबली. म्हणून आणखी वेळ गेला. अचरोलला पोचल्यावर कळले की एक मंत्रीही येणार आहेत. एकूण ‘गोष्टी' च्या कार्यक्रमाला हळूहळू सभेचे रूप येणार असा रंग दिसू लागला. ‘गोष्टी' म्हणजे अनौपचारिक बैठक किंवा ग्रामसभा. सगळ्यांनी भाग घ्यायचा. कुणी वक्ता नाही, अध्यक्ष नाही. सगळेच श्रोते आणि वक्ते. नवचेतना सप्ताहानिमित्त असे 'गोष्टी'चे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू होते. त्यातला आजचा एक अचरोलचा.

 जयपूर-दिल्ली हमरस्त्यावरचे हे एक पाच-सात हजार वस्तीचे गाव: राष्ट्रीय हमरस्त्याला लागून असले, तरी अत्यंत गलिच्छ. गावात श्रीमंत शेतकऱ्यांची–ठाकूरांची घरे कमी नव्हती. पूर्वजांच्या समाध्या केवढ्या मोठमोठया बांधलेल्या दिसत होत्या ! बाजारही गजबजलेला, भरलेला होता. वीज, पाणी वगैरे सोई होत्याच, पण गलिच्छपणाही भरपूर. कोपऱ्यात, अरुंद रस्त्यांच्या वळणांवर घाणीचे ढीग, पाण्याची डबकी. कोंदटलेली अंधारी घरे, माणसे मात्र रुबाबदार. झुपकेदार मिशांचे आकडे वळवलेली. प्रत्येकाच्या नावापुढे 'सिंग' आहेच !

 तीन-साडेतीनची सभा पाहुणे जमल्यावर पाच-सव्वापाचला सुरू झाली. दोन आमदार, एक खासदार, एक मंत्री, एक समाजकार्यकर्ता, अॅडिशनल कलेक्टर,बी.डी.ओ., प्रसिद्धीअधिकारी एवढा सगळा सरकारी लवाजमा असूनही गावकरी धीटपणे बोलताना पाहून बरे वाटले. बायकाही होत्या. एकदा निवडून गेल्यावर आमदार-खासदारांनी पुन्हा आपल्या मतदारसंघात फिरण्याची प्रथा येथे गेल्या तीस वर्षांत नव्हती. लोकांचीही तशी अपेक्षा नसायची. प्रथमच जनता सरकारचे मंत्री, आमदार-खासदार असे गावोगाव, आपल्या किंवा इतरांच्या मतदार संघातून फिरू लागलेले आहेत.

निर्माणपर्व । १९४