पान:निर्माणपर्व.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लवकर फोफावली. आपणहून लोक संस्थेच्या अध्यक्षांकडे नवीनवी प्रकरणे घेऊन दाखल होऊ लागले. विविध प्रकारची महत्त्वाची माहिती पुरवू लागले-
 पाडळद्याच्या दंगल जाळपोळीबद्दल पोलिसांनी काही गुजरांना धरले व त्यांच्यावर हद्दपारीचा हुकूम बजावला. हा हुकूम गुजरांनी कोर्टात जाऊन कसा बदलून घेतला, त्याची सुरस दंतकथा (!) एका पत्रान्वये संस्थेच्या अध्यक्षांकडे कळविली गेली. पत्र आहे गेल्या वर्षाचे-८।७।७० चे. अनेकजणांनी मिळून लिहिलेले. फार लांबलचक असल्याने सगळे काही येथे देता येत नाही. थोडक्यात ते असे-

 अध्यक्षसाहेब, आदिवासी भिल्ल सेवा मंडळ यांचे सेवेशी, आम्ही खाली सह्या करणारे पाडळदे येथील आदिवासी तारीख व वार आठवत नाही नारायण दत्तू पाटील यांचे बुडी गव्हाण रस्त्यावरील उसाचे मळयांत चाऱ्या पाडण्यासाठी सकाळी अंदाजे वेळ ८ वाजता कामाला गाव दरवाज्यातून जात होतो. गांव दरवाज्यात सकाळी बरेच गुजर लोक हजर होते.
 आम्ही त्यांचेजवळून जात असता त्यांनी आमची थट्टा मस्करी करता करता शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला, त्यांनी तीव्र परिणामकारक भावनेच्या भरात बोलण्यास सुरुवात केली, काहीची शिवीगाळ चालूच होती त्या टोळक्यात हजर असलेले १ : उद्धव छगन पाटील २: रोहीदास शंकर पाटील ३ : श्रीपत विठ्ठल पाटील ४: विठ्ठल छगन पाटील ५ : रामजी हसन चौधरी ६ : भायदास मदन पाटील ७ : रोहीदास भूता पाटील यांनी व त्यांचे सोबत असलेल्या सोबत्यांनी अभिमानाने मोठ्या आवाजात आपली बढाई करायला सुरुवात केली. त्यांत श्रीपत विठ्ठल व विठ्ठल छगन, रावजी हसन चौधरी यांनी आदिवासींचा निषेद करून तुमचा अंबरमहाराजाने काय होणार आहे, तुमच्याजवळ कोणाला देण्यासाठी पैसा नाही. आम्ही गुजर लोकांनी जवळजवळ ३ लाख रुपये गावातून वरगनी करून जमवले व ते रुपये, X X X यांना देण्यात आले व त्यामुळे केस-आमची केस काढली आहे. तुमच्याने आमचे काय झाले.
 मा. श्री. अंबरसिंग महाराज यांना आमची हात जोडून विनंती आहे. मागीलप्रमाणे आजही त्रास होण्याची व धमकीचा जन्म झालेला आहे. त्यामुळे क्रोधाने अवतार घेतल्यावर आमचे आदिवासी बांधवावर मागील प्रसंग परत हे राक्षसी व खुनशी वृत्तीचे लोक वरील मंडळींच्या सहकार्याने आनणार आहेत. वेळांत पायबंधी घातली नाही तर आम्हाला परत गाव व घर सोडून बायको-मूल व घरातील सामान सोडून मार्ग मिळेल त्या मार्गाने पळून जावे लागेल. मा. कृपाळू आपण आम्हाला आभय कराल अशी विनती आहे.

 सह्या :- झालु शंकर, सांबर आंबर, सुदाम नावजी, वाल्या भलजी, सांबरसिंग आंबऱ्या.

निर्माणपर्व । १८