पान:निर्माणपर्व.pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आवळली जाईल तसतशी त्यांच्याविषयीची जनसामान्यांची सहानुभूतीची भावना वाढीस लागेल. हाही धोका ओळखूनच त्यांच्याविरुद्ध उपाययोजनेची पावले टाकणे, राज्यकर्त्यांच्या हिताचे आहे. त्यातून इंदिरा गांधी या एक स्त्री आहेत. जनमानस कसे पलटी खाईल, काय सांगावे ? काँग्रेस नको म्हणणाऱ्यांनाही रायबरेलीतील इंदिरा गांधींचा पराभव हा विषादपूर्ण वाटला, ही वस्तुस्थिती आहे. इंदिरा गांधींविरुद्ध द्वेषाग्नी फुलवणाऱ्यानी याही 'प्रातिनिधिक ' लोकभावनेचा अवश्य विचार करायला हवा, नाही तर परिणाम उलटाच व्हायचा. यशवंतराव मोहिते तर आजही छातीठोकपणे म्हणतच आहेत 'त्या महान पात्रतेच्या आणि निष्ठावान नेत्या आहेत, असा सामान्यजनांना भरवसा आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप केले जावोत, लोक त्यावर गंभीरपणे विश्वास ठेवीत नाहीत..' ‘ऐकीव प्रचाराने वाहवून जाणाऱ्या बुद्धिवाद्यांसारखे सामान्य लोक नाहीत. बहुजन समाजातील व्यक्तीवर आणि गोष्टीवर त्यांची स्वत:ची अशी श्रद्धा असते; तर स्वतःला स्वीकारार्ह अशा प्रचाराने बुद्धिवादी वाहवतात...'(गतिमान साप्ताहिक, १३ ऑगस्ट १९७७ अंकातील मुलाखत). यशवंतराव चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात ही इंदिरानिष्ठा आज व्यक्त होत आहे तर इतर ठिकाणी, विशेषतः जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे, वारे अधिकच इंदिरानुकूल असण्याची शक्यता कशी नाकारून चालेल ?


Let hundred flowers bloom- ‘शंभर फुले उमलू द्यात' ही घोषणा जरी हुकुमशाही देशातून आलेली असली, तरी लोकशाही जीवनपद्धतीचे ते मुख्य लक्षण मानण्यात येते. स्वतंत्रभाव जपणाच्या व्यक्ती आणि संस्था याचे जाळे ज्या देशात खोलवर रुजलेले असते, तेथे लोकशाही अस्तित्वात असत. कुठल्याही शासनसंस्थेची प्रवृत्ती नेहमीच केंद्रीकरणाकडे धावत असते. विकेंद्रीकरणाच्या प्रवृत्तीही दुसऱ्या बाजूने जोमदार असतील, तर समाजात एक परस्परविरोधी ताण तयार होतो व तो कायम राहणे समतोलाच्या दृष्टीने आवश्यक असते. इंग्रजी राज्याच्या आगमनाबरोबर आपल्याकडील स्वयंपूर्ण खेड्यांच्या रूपाने असलेली विकेंद्रीकरणाची बाजू पूर्णपणे उध्वस्त झाली. राजकीय व आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण वाढून आवश्यक असलेला समतोल ढासळला. स्वातंत्र्यानंतरही या परिस्थितीत बदल झाला नाही व इंदिरा गांधींचे शासनही पाच विकासक्रमाची अंतिम अवस्था ठरले. आता इंदिरा गांधी नाहीत. पुन्हा येतील किंवा न येतील; परंतु केंद्रीकरणाची प्रवृत्ती मात्र मुळीच रोखली गेलेली नाही. नागरिक स्वातंत्र्ये नव्या जनता पक्षाने पुन्हा प्रस्थापित केलेली आहेत, हे खरे; पण ती किती तकलादू असतात याचा आपला अनुभव ताजाच आहे.

-१२

शंभर फुले उमलू द्यात । १८१