पान:निर्माणपर्व.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काही घटना अर्जातून कळविण्यापलीकडच्या असत.

 अंबरसिंगच्या प्रत्यक्ष मावशीचीच कथा. अंबरसिंगने सांगितलेली. आम्ही समक्ष बाईच्या तोंडून तिच्या झोपडीत जाऊन ऐकलेली.
 -सकाळी नवरा कामाला गेला. बाई दळायला म्हणून बाहेर पडण्याच्या विचारात. समोर उत्तम हांडू कोळी उभा. त्याच्या हातात भाला असतो. धडीबाईला दळणाचे टोपले खाली उतरवून बाजूस ठेवावे लागते. ओरडलीस तर ठार करीन या दरडावणीपुढे तिचे काही चालत नाही. उत्तम तिला 'वापरून'मोकळा होतो.
 धडीबाई त्यावेळी पंधरा दिवसांची बाळंतीण असते.
 मुले जवळपासच असतात.
 वेळ सकाळची ९-९।। ची असते.
 नवरा आल्यावर त्याला सर्व हकीकत कळते.
 तो हतबुद्ध होतो.
 पंचांकडे आपली तक्रार घेऊन जातो.
 पंचमंडळी शाहू-गुजर-पाटील-कोळी या समाजापैकी.
 उत्तम हांडू कोळी या लोकांच्या मर्जीतला. पीक संरक्षण सोसायटीचा सेक्रेटरीच. उत्तमला ५१ रुपये दंडाची शिक्षा होते.

 अंबरसिंगला ही घटना समजली तेव्हा तो मात्र नवऱ्याला जाऊन सांगतो. तू जगायला नालायक आहेस. तुझ्या बायकोची दिवसा ढवळ्या एवढी इज्जत लुटली गेली तरी तू स्वस्थ कसा? मरून का नाही गेलास? पुढे काहीही घडलं असतं तरी आम्ही ते निस्तरलं असतं. तू जिवंत राहायला नको होतं...

 एक नवा अंबरसिंग जन्माला येत होता.

 अंबरसिंगला वाटले असावे, आता यापुढची वाटचाल स्वतंत्र करावी. सातपुडा सर्वोदय मंडळाला सारखे गोवणे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. आधीच सरकारी वर्तुळात, गुजर-पाटील समाजात संस्थेबद्दल आकस. आपल्या एखाद्या हालचालीमुळे संस्था, तिचे आदरणीय प्रमुख मुंदडाजी यांच्या कार्याला बाधा यायची. त्याने कोणाला फारसे न विचारता गुपचूप एक संस्था सुरू करून दिली-- 'भिल्ल आदिवासी सेवा मंडळ.' या संस्थेचा अध्यक्ष म्हणून तो काम पाहू लागला.

 संस्थेला घटना नव्हती पण कार्यकर्ते खूप होते. त्यामुळे असेल कदाचित, ती

शहादे । १७