पान:निर्माणपर्व.pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उघड करणे शहाणपणाचे नाही. मजकूर सुटला नसता तर मात्र कर्जाचा डोंगर उरावर घेऊन माणूस दिवाळीतच गाडला गेला असता, यात काही शंका नाही. इतका मोठा धोका त्यावेळी पत्करलेला होता.
 जैनचीही कमाल होती. एका साखळी वृतपत्रात काम करून त्याने माणूसबरोबर हा धोका पत्करण्याची तयारी ठेवावी, हे त्यावेळी तरी विशेष धाडसच होते.
 या धाडसाचे शेवटी चीज झाले. अनेकांनी जैनची पाठ थोपटली, त्याला मनापासून शाबासकी दिली. तुरुंगातून बापू काळदाते यांचे पत्र यावे, हा तर या सर्व स्वागताचा कळस होता.
 तुरुंगात या अनुवादावर व्याख्यानमाला गुंफल्या गेल्याचेही नंतर कळले.
 आणखी काय हवे होते? ज्यांच्या डोळ्यासमोर दिवाळी असूनही अंधार होता, त्यांना प्रकाशाचे, उत्साहाचे चार क्षण जर या अंकाने दिले असतील, तर आणखी कुठली सफलता हवी होती?
 आणीबाणीविरुद्ध गजाआडून ते लढत होतेच.
 गजाबाहेरूनही त्यांना साथ देणे हे आपले कर्तव्यच नव्हते का?
 इनामदार-जैन अशांसारख्या नव्या किंवा अनंतराव-कानिटकर-भावे या जुन्या लेखकांच्या व इतर अनेक लेखक-मित्रांच्या साहाय्याने हे कर्तव्यपालन 'माणूस'ने केले, इतकेच.
 गाजावाजा न करता, वावदूकपणा टाळून, सातत्याने.
 यात असलेच श्रेय तर सर्वांचे.
 किवा या कठीण काळात 'माणूस' बंद न पडू देणा-या कुठल्या तरी अज्ञात शक्तीचे.
 या विराट अज्ञातासमोर 'माणूस' नम्र आहे.
 म्हणूनच कदाचित तो या विलक्षण भयपर्वातही ताठ मानेने जगू शकला, निर्भय राहू शकला.

१६ एप्रिल १९७७



चित्त हवे भयशून्य । १७५